रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोसह ६ ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे,५ जानेवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (५ जानेवारी) सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकली. त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. शुक्रवारी पुणे, बारामती,कन्नड  आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. एकूण ६ ठिकाणी छापेमारी केल्याची प्राथमिक माहिती आहे.

रोहित पवार हे बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचे बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. तथापि, या धाडींबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात असल्याचे मात्र समजतेय.

यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक विभागाने रोहित पवार यांच्याविरोधात कारवाई केली होती. प्रदूषण नियंत्रक विभागाने बारामती अ‍ॅग्रो कंपनीला 72 तासात प्लान्ट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रोहित पवारांनी कोर्टात धाव घेतली असता कोर्टाने कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांच्याशी संबंधित पुणे, बारामती आणि इतर अशा सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.

गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही.

आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…”

बारामती अ‍ॅग्रो कंपनी ही आमदार रोहित पवारांची कंपनी आहे. ही कंपनी बारामती तालुक्यातील पिंपळी येथे आहे. आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली. सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान हे अधिकारी येथे पोहोचले. तेव्हापासून चौकशी सुरू आहे. त्याशिवाय मुंबईसह इतर ठिकाणीही धाडी मारल्या आहेत.

दरम्यान, रोहित पवार यांना गेल्यावर्षी बारामती अ‍ॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यावहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. याप्रकरणी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या कंपनीत छापेमारी झाल्याचे ते बोलले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचं आतापर्यंतचे काम हे उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवारांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवार गटाच्या प्रत्येक नेत्याने रोहित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

दरम्यान, या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.”रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचे हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत”, अशी पोस्ट करत आव्हाडांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. याशिवाय, “रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल”, असा विश्वासही व्यक्त केला.