जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

मानद डॉक्टरेट पदवी राज्यातील जनतेला समर्पित – उपमुख्यमंत्री

मुंबई,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :- राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी भावोत्कट मनोगत व्यक्त केले. भारत-जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना त्यांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, कोयासन विद्यापीठ हे कू काई यांनी सुरू केले. त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला. जगातील महत्वाचे केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे. मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो. त्यामुळे बुद्धधम्माच्या प्रसारात असलेल्या या सर्वात जुन्या विद्यापीठाकडून सन्मान हा भावोत्कट क्षण आहे. या क्षणी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

महाराष्ट्र–कोयासन मैत्रीची सुरुवात तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री असताना मी तिथे गेलो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तेथे आपण उभारला. आताही ही मैत्री निरंतर सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. जपानने सातत्याने भारताला आणि  महाराष्ट्राला मदत केली. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. त्यामुळेच हा केवळ मैत्रीचा नव्हे, तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारा अध्याय आहे. कोयासन विद्यापीठाने डॉक्टरेट देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टीचा विचार केल्याचे ते म्हणाले.

आपल्या राज्याने पायाभूत क्षेत्र विकासासाठी 2014 मध्ये काम सुरु केले. मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्र सेतू यासह अनेक प्रकल्पासाठी मोठी मदत जपान सरकारने केली आहे. याशिवाय,  शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात मदत जपानने केली आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे. पूरनियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केले जाणार आहे. आता आपण या क्षेत्रात अशा ठिकाणी आहोत की इतर राज्यांना आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल, असे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा ही विकासाची गुरुकिल्ली आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. महाराष्ट्र हे स्टार्ट अप कॅपिटल झाले आहे. कोणतेही राज्य पुढे न्यायचे असेल, तर चांगल्या प्रशासनाची गरज असते आणि महाराष्ट्र हे त्यासाठी ओळखले जाते. आपण 2014 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केले. त्यामुळे देशाच्या तुलनेत राज्यातील जमिनीची पाणी पातळी उंचावण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र हे असीमित शक्ती असणारे राज्य आहे. नवभारत निर्माणासाठीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो. सामाजिक समतेचा मोठा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानाद्वारे संधीची समानता दिली. त्यामुळे आपण सर्व समाज घटकांना पुढे कसे नेता येईल, त्यांना शिक्षणाची संधी, शिष्यवृत्ती याद्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या – इतिहासात प्रथमच देशाबाहेरील मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आहे. जलसुलभता आणि सामाजिक ऐक्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना देण्यात आली. महाराष्ट्र आणि जपान यांचे नाते दृढ करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे. आपले राज्य परकीय गुंतवणूक करण्यात आघाडीवर असून त्यात जपानने सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली असल्याचे ते म्हणाले.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा सातत्याने ध्यास घेतलेले उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांचे व्यक्तिमत्व आहे. राज्यात त्यांच्या कार्यकाळात मोठी गुंतवणूक झाली. जपानच्या विद्यापीठाकडून एका उमद्या व्यक्तीमत्वाचा सन्मान झाला आहे.

डॉ. फुकाहोरी यासुकाता म्हणाले की, ही उपस्थिती सर्वांसाठी आनंददायी आहे. कोयासन विद्यापीठ हे ख्यातनाम विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला 1200 वर्षांचा इतिहास आहे. श्री. फडणवीस यांनी जपानचा दौरा केला. अनेक उद्योजकांना भेटले. त्यानंतर अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले असल्याचे त्यांनी नमूद केले.

यामाशिता योशियो यांनी यावेळी मानद डॉक्टरेट पदवीच्या मानपत्राचे वाचन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कुलकर्णी यांनी स्वागत केले तर आभार उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नामवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.