मोदींचा जलवा कायम? शरद पवार म्हणाले…

मुंबई,३ डिसेंबर / प्रतिनिधी :-आजच्या निकालांचा इंडिया आघाडीवर काही परिणाम होईल का? याबाबतच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत हाली आलेल्या आकड्यांवर मतमोजणी सुरु असलेल्या या चार राज्यांपैकी तेलंगणा वगळता इतर राज्यांचे निकाल भाजपच्या बाजूने झुकताना दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांना आजच्या निकालांचा इंडिया आघाडीवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकांचा इंडिया आघाडीवर काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही. आम्ही मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक घेणार आहोत. या बैठकीत निकालांचं विश्लेषण केलं जाईल. तज्ज्ञांकडून या निकालांचे बारकावे जाणून घेतले जातील आणि त्यानंतरही आम्ही आमचं मत मांडू, असं पवार म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुकांदरम्यान मी या राज्यांमध्ये गेलो नसल्याने तिथं नेमकी काय स्थिती होती. याची कल्पना नाही. मंगळवारी दिल्लीत आमची बैठक झाल्यानंतर याबाबत आणखी स्पष्टपणे बोलता येईल.

यावेळी शरद पवार यांनी ईव्हीएम बाबत देखील भाष्य केलं. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, निकालापूर्वी काही लोकांनी आमच्याकडे ईव्हीएमबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, माझ्याकडे याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. अशा स्थितीत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी काही मत व्यक्त करणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

भाजपला मिळालेल्या विजयामुळे पंतप्रधान मोदी यांची जादू अद्याप कायम असल्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, अद्याप मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यावर आपण यावर मत तयार करु शकतो असं उत्तर पवार यांनी दिलं.