मराठा आरक्षणात भाजपचा खोडा- उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई : जातीपातींमध्ये भिंती उभारून आणि दुहीची बीजे पेरून राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मराठा आरक्षणातही मोडता घालण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यात केला. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आज शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर शिवसैनिकांचा लाखोंचा जनसमुदाय जमला होता. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना भाजपसह शिंदेगटावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर देखील भाष्य केलं. अपात्रतेचा निकाल कधी लावायला तो लावा. २० वर्ष ५० वर्षानंतर लावा. पण, संपूर्ण जग पाहत आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हा वाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 ‘‘मराठा समाजाने प्रदीर्घ आंदोलन केले असून, आरक्षणाच्या मागणीसाठी युवक आत्महत्या करीत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे अमानुष अत्याचार करण्यात आला. आमच्याही सरकारच्या काळात आंदोलने झाली. पोलिसांना आदेश दिल्याशिवाय ते बळाचा वापर करीत नाहीत. माझ्या काळात मी कधीच पोलिसांना असे आदेश दिले  नव्हते. मग, जालना पोलीस अधीक्षकांना लाठीमाराचे आदेश सरकारमधून कोणी दिले आणि जालन्यातील ‘जनरल डायर’ कोण’’, असा सवाल करीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

ते पुढे म्हणाले की, हे जाम निर्लज्जम सदासुखी आहेत. न्यायालयाने त्यांच्या कानफाटात मारली तरी ते गाल चोळत म्हणतात की आम्ही टाईमटेबल सादर करु. अनेक क्रांतीकारकांनी रत्त सांडून, बलिदान देऊन भारतमातेला मुक्त केल. त्या भारतमातेची लोकशाही टिकणार आहेकी नाही. याच्याकडे आमचे लक्ष आहे. ३० तारखेला काय होतय ते बघायचं आहे. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. अपात्र कोणाला ठरवणार हे जनतेने आधीच ठरवून टाकलं आहे. प्रकरणाचा निकाल लावण्याआधी निवडणूका घेऊन दाखवा. जनता ठरवेल पात्र की अपात्र. जनता देईल तो निकाल आम्हाला मान्य असेल, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात गद्दारांकडे दुर्लत्र करा, असं शिवसैनिकांना सांगितलं. तर दुसरीकडे पीक विम्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना घेराव घाला. असं आवाहन देखील केलं. त्यांनी नेमहीप्रमाणे हिंदुत्वाची व्याख्या करत रिकाम्या थाळ्या वाजवायला लावणारं आमचं हिंदूत्व नसून कोरोना काळात ५ रुपयात शिवभोजन थाळीने गरिबाचं पोट भरणारं आमचं हिंदुत्व आहे, असं ते म्हणाले. त्यांनी आमचं हिंदूत्व हे शेंडी जानव्याचं हिंदूत्व नसल्याचं देखील पुन्हा एकदा सांगितलं.