ईसीटीए स्वाक्षरी:भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस,एका दशकानंतर विकसित देशासोबतचा हा पहिला करार

नवी दिल्ली,२ एप्रिल /प्रतिनिधी :- पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या  उपस्थितीत आज भारत सरकारमधील केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल आणि ऑस्ट्रेलिया सरकारमधील  व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुक मंत्री डॅन तेहान यांनी आभासी समारंभाच्या माध्यमातून भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर  (“भारत -ऑस्ट्रेलिया  ईसीटीए”) स्वाक्षरी केली.

इतक्या अल्प  कालावधीत भारत -ऑस्ट्रेलिया ईसीटीए करारावर स्वाक्षरी झाल्याने उभय देशांमधील परस्पर विश्वासाची दृढता प्रतिबिंबित होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर बोलताना सांगितले. परस्परांच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमता अधोरेखित करत मोदी म्हणाले की,  या करारामुळे दोन्ही देशांना या संधींचा पुरेपूर फायदा घेता येईल. “हा आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी एक अलौकिक क्षण आहे”, यावर त्यांनी जोर दिला. “या कराराच्या आधारावर, आम्हाला एकत्रितपणे, पुरवठा साखळीतील लवचिकता वाढवता येईल  आणि हिंद – प्रशांत प्रदेशाच्या स्थैर्यासाठी देखील योगदान देता येईल. “, असे पंतप्रधान म्हणाले.

‘लोकांचे लोकांशी असलेले नाते’ हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “या करारामुळे विद्यार्थी,व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यातील देवाणघेवाण सुलभ होईल,ज्यामुळे हे संबंध अधिक दृढ होतील.”

स्वाक्षरी समारंभानंतर श्री डॅन तेहान यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांच्या उदघाटनपर भाषणात, श्री गोयल म्हणाले, की भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA)   हा खरोखरीच आमच्या एकता (Ekta) आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे.  एका दशकानंतर झालेला विकसित देशासोबतचा हा पहिला करार असल्याने आजचा  दिवस हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून श्री गोयल पुढे म्हणाले की, आमचे नाते निष्ठा आणि विश्वासार्हता यांच्या आधारस्तंभांवर टिकून आहे, जे  क्वाड आणि पुरवठा साखळीद्वारे सखोल होत असलेल्या आमच्या भौगोलिक-सामरिक प्रतिबद्धतेतून योग्यरित्या दिसून येते. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे असे  नैसर्गिक भागीदार आहेत, जे लोकशाही, कायद्याचे राज्य आणि पारदर्शकतेच्या समान मूल्यांनी जोडलेले आहेत, असे सांगत श्री गोयल म्हणाले की, इंड-ऑस एक्टा (ECTA) करारामुळे, येत्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार जवळजवळ दुप्पट म्हणजे 50 अब्ज पर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.ते म्हणाले की, कापड आणि वस्त्रे, चामडे,आदरातिथ्य क्षेत्र,रत्ने आणि दागिने, इंजिनीअरिंग वस्तू आणि फार्मा, माहिती तंत्रज्ञान,स्टार्टअप इ.यांसारख्या क्षेत्रात भारतीय निर्यातीला मोठी संधी आहे.  ऑस्ट्रेलियाला भारताने  शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक सेवा, आरोग्य आणि दृकश्राव्य माध्यम यासारख्या भारताला  स्वारस्य असलेल्या प्रमुख क्षेत्रांतील  सेवांसाठी वचनबद्ध केले आहे तर ऑस्ट्रेलिया विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोत्तर कर्मचारी व्हिसा,हाॅटेलमधील स्वयंपाकी यांच्या नोकरीसाठी विशेष राखीव जागा, योग प्रशिक्षक  आणि तरुण व्यावसायिकांसाठी कार्य आणि सुट्टीचा व्हिसा देखील उपलब्ध करेल.

Image

श्री गोयल म्हणाले की, हा करार मालाच्या आयातीत अचानक होणाऱ्या वाढीपासून संरक्षण करण्यासाठी, गोंधळ टाळण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रदान करत असून; यात 15 वर्षांनंतर प्रथमच अनिवार्य पुनरावलोकनासाठी यंत्रणा समाविष्ट केली जात आहे.  इंड-ऑस हा करार (ECTA) केवळ व्यापार आणि व्यावसायिक संबंधांच्या एका नव्या युगाची सुरुवात करेल इतकेच नाही, तर आपल्या देशांतर्गत संबंधांना अधिक उंचीवर घेऊन जाईल, हे अधोरेखित करून श्री गोयल म्हणाले की, येत्या काही दिवसांत श्री.गोयल  ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत.