सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव : तातडीने पिकांचे पंचनामे करा

विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, मदत व पुनर्वसनला निर्देश

मुंबई,३ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि  खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून  कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात झालेला बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.

नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले.