कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींची दारे उघडली गेली: पंतप्रधान मोदी
मुंबई , 29 नोव्हेंबर 2020
भारतात शेती आणि शेतीशी संबंधित नव्या गोष्टी घडत आहेत आणि या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी कायदे केले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांवर असलेली बंधने रद्द होऊन त्यांना नवीन अधिकार मिळत आहेत असे सांगताना पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जितेंद्र भोई यांचे उदाहरण दिले. आपल्या मका या पिकाचे राहिलेले पैसे व्यापाऱ्याकडून मिळवण्यासाठी जितेंद्र यांना नवीन कृषी कायद्यांचा कसा फायदा झाला ते पंतप्रधानांनी नमूद केले आणि या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर असल्याची त्यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी अजिंठ्याच्या लेण्यांचा वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या प्रयत्नांचा देखील उल्लेख केला तसेच येत्या बारा नोव्हेंबर रोजी असलेल्या डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीची देखील पंतप्रधानांनी आठवण केली.
परदेशात लोकांना वेदांत आणि गीता शिकवणाऱ्या जॉनस मसेट्टी उर्फ विश्वनाथ यांच्या बद्दल देखील पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले तसेच संसदेवर निवडून आल्यानंतर संस्कृत भाषेमध्ये शपथ घेणाऱ्या न्यूझीलंडचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर गौरव शर्मा यांचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.
लंगरची प्रथा सुरू करणाऱ्या गुरू नानक देवजींना पंतप्रधानांनी नमन केले व आपणा सर्वांकडून जनतेची सेवा सुरू रहावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या शिक्षणाचा आपल्यावरील प्रभाव आणि आपल्या शाळा-कॉलेज विषयी असलेली आपली आत्मीयता कधीही विसरत नाही असे सांगून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळा-कॉलेज बरोबरचे बंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
येत्या पाच डिसेंबरला असणाऱ्या श्री अरबिंदो यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण करून आत्मनिर्भर भारतचा मंत्र त्यांच्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले.
येत्या सहा डिसेंबर रोजी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी सर्वांना एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करण्याच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून दिली.यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा न दाखवण्याचे आवाहन देखील केले.
‘देवी अन्नपूर्णा’ची १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मूर्ती कॅनडाहून येणार परत – पंतप्रधान
आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार होत राहिला आहे. अशीच एक १०० वर्षांपूर्वीची देवी अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली गेली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत आहे, ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कर्यक्रमातून दिली.
मोदी म्हणाले, “मी आज सर्वांशी एक खूशखबरी देत आहे. प्रत्येक भारतीयाला हे ऐकून गर्व वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक खूपच जुनी मूर्ती कॅनडातून भारतात परत येत आहे. ही मूर्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. मी कॅनडा सरकार आणि हे पुण्य कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानतो.”