राजकीय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले -विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

नागपूर ,२६सप्टेंबर/प्रतिनिधी :- आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचा सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केलं, असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अंबादास दानवे यांनी आज नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन पूरग्रस्त नागपूरकरांशी त्यांनी संवाद साधला.


या घटनेला नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हे ही तितकेच जबाबदार असून यांच्यात समनव्य नसल्याचे दिसून आल्याचे दानवे यांनी म्हणत प्रशासन यंत्रणेच्या कारभारावरही त्यांनी बोट ठेवलं.
प्रशासन यंत्रणा घटना घडण्याची वाट बघत होते का अशी स्थिती आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मात्र या भिंतीचे काम हे चार टप्प्यात होणार होत. पहिल्या टप्प्याच काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.


सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याच काम नव्याने करावं लागेल अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीचे चारही टप्प्यांच्या कामाचा नव्याने डीपीआर बनवून काम लवकरात लवकर हाती घ्यावं, या कामात आमचं सहकार्य राहील अशा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्याचे दानवे म्हणाले.प्रशासन यंत्रेणवर नसलेलं नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावं लागत असेल तर हे दुर्दैव असल्याची टीका दानवे यांनी केली.

अंबादास दानवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या शिवसेनेवर घाणाघात केला आहे.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिमा सुधारु शकत नाही. यांची प्रतिमा काही राहिलीच नाही. आता ती काय सुधारणात? उलट यांनी महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवली आहे. यांना ५० खोके म्हणून आता ओळखले जाते.

बाववकुळे यांच्या पक्षात दम राहिला नाही.

अतिवृष्टीची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, बावनकुळे यांच्या पक्षात दम राहिलेला नाही. म्हणून त्यांना बाहेरुन लोक आणावे लागत आहे. इनकमिंग कोणाला करावं गागतं. ज्यांच्या पक्षात नेतृत्वाचा अभाव असतो, असं दानवे म्हणाले.

यावेळी दानवे यांनी अंबाझरी लेआऊट येथे पूरग्रस्त परिस्थितीचा पाहणी केली. दानवेंनी काही कुटुंबीयांशी बोलून संवादही साधला. अनेक घरातील लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. भयावह परिस्थिती होती. नियोजनाचा अभावचा विषय दिसतो. मोठ्या घोषणा होत्या. पण काम होत नहाी. असं ते म्हणाले.

यावेळी संपर्क प्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी खासदार प्रकाश जाधव , सुरेखा खोब्रागडे जिल्हा संघटिका, शिल्पा बोडखे पूर्व विदर्भ महिला संघटिका, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व पदाधिकारी उपस्थित होते.