मनसेचा लढा योग्यच; सुप्रीम कोर्टाचेही शिक्कामोर्तब!दुकानांवर मराठी पाट्यांबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काय म्हणाले राज ठाकरे?

मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला?

मुंबई : महाराष्ट्रात मराठीचं स्थान आणि दर्जा कायम राहावा या उद्दिष्टांवर राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना झालेली आहे. यातूनच महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानावर मराठी पाटी असावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली. महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांना मराठीत सूचनाफलक लावणे बंधनकारक केले होते. याला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत ही बाब न्यायालयात मांडली. त्यावर सुप्रीम कोर्टानेही राज ठाकरेंच्या बाजूने निकाल देत महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानदाराला आपल्या दुकानावर मराठी पाटी लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाचे राज ठाकरे यांनी अर्थातच स्वागत करत विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना चपराक लगावली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या एक्स (X) हँडलवरुन पोस्ट करत म्हटले की, पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनं यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्षे जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.

काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक मिळाली…

असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजे, असं राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.