मनोज जरांगेंचे सरकारला आवाहन ; म्हणाले, “आम्ही पुरावे देतो, वेळ वाया घालवू नका”

जालना ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासाठी आमरण  उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपक्ष देण्यासाठी वेळ लागणार असेल तर एका दिवसात अद्यादेश, जीआर काढता येईल. इतके पुरावे आम्ही द्यायला तयार आहोत. सरकारने यावं पुरावे देतो. मराठवाड्यातील मराठा कुणबी असल्याचे कागदपत्र आहेत. सरकारचा ४ दिवसांचा वेळ वाया जाऊ नये. त्यासाठी आम्ही पुरावे द्यायला तयार आहोत. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं. आम्ही एका दिवसात अध्यादेश निघेल एवढे कायदेशीर पुरावे द्यायला तयार आहोत, असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणानंतर आज जरांगे यांची तब्येत खालावली असून जरांगे पाटील यांच्यावर ताबोडतोब उपचार केला जात आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या अनेक माणसानांनी येऊन मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. थोड्या दिवसाआधीचं राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगत एक महिन्याचा वेळ मागितला होता.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारची इच्छाशक्ती असेल तर एका कागदावरही अध्यादेश देऊ शकते. आम्हाला सरकारला वेठीस धरायचं नाही. विधानसभा नसली तरी आम्ही जी कागदे देतोय त्याआधारे राज्यपालांच्या आदेशाने वटहुकूम काढू शकता. राज्य सरकारला कायदा बनवायचा अधिकार आहे. आमचं आमंत्रण स्वीकारा आणि मराठा समाजाचं कल्याण करा, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

तुम्ही महिन्याभराची मुदत मागताय तुम्ही महिन्याभरात जो डेटा जमा करणार तो आम्ही तुम्हाला देतो. तुमचाही वेळ वाया जाणार नाही. आम्ही सगळे पुरावे देतो. सरकारला पळण्याची गरज नाही. सरकारची अडचण समजून घेणारे आम्ही कोणी नाही, सरकारने जनतेची अडचण समजून घ्यायची आहे. आम्ही पुरावे देऊन मागणी करतोय, त्यामुळे सरकारचा मराठा आंदोलनाला वेठीस धरतंय अशी दाट शक्यता आहे, असं जरांगे म्हणाले.

हे आंदोलन राजकारन्यांनी उभे केलेले नाही. आम्हाला पूर्वीपासून ओबीसींमध्ये आरक्षण आहे. ओबीसींमधील ८३ व्या क्रमांकावर कुणबी मराठा आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी समन्वयाने घ्यावं. वरचे आपलं चांगलं होऊ देणार नाही. एकमेकांच्या समन्वयाने पुढे जाऊ. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा एकत्र येऊन मोठं आंदोलन करू. हे लोक एकमेकांच्या अंगावर घालायचं काम करत आहेत, असा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला.