मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने तेथील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर सुरू झाला मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्याची सोय केली जात आहे. दरम्यान, ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर, मध्य तसेच पूर्व भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची स्थिती असेल. यासोबतच महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात पावसाचे पुनरागमन होईल. या राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला पाहायला मिळू शकतो.

उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे पुढच्या ५ ते ७ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यंदाच्या वर्षात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. गेल्या शंभर वर्षात ऑगस्ट महिना कोरडा गेल्याची घटना घडली नव्हती. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. पाण्याविना पिके कशी जगणार अशी चिंता त्यांना लागली आहे. मात्र सप्टेंबरमध्ये तरी पुरेसा पाऊस पडावा अशीच आशा बळीराजा धरून आहे.