तलाठीची परीक्षा आज होणारच! वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत परीक्षा आयोजन संस्थेचा उमेदवारांना मेल

छत्रपती संभाजीनगर,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यातील जालनाच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी तालुक्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभात निषेध व्यक्त केला जात असून रास्ता रोको तसंच आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे. उद्या(४ सप्टेंबर) विविध संघटनांकडून बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, बंद पुकारण्यात आला असला तरी तलाठी भरतीची परिक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य खबरदारी घेऊन वेळेपूर्वी परिक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन परीक्षेचं आयोजन करणाऱ्या संस्थेने केलं आहे.

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध संघटनांनी उद्या सोमवारी बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतूकीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून त्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन उमेदरवांनी वेळेत परिक्षा केंद्रावर उपस्थित राहवं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सध्या राज्यभर तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरु आहे. त्याचा एक टप्पा उद्या सोमवार रोजी पार पडणार आहे. जालन्यात घडलेल्या घटनेचा परिणाम परीक्षेवर होणार नसून परीक्षा वेळेत होणार असल्याचं सांगगण्यात आलं आहे.

ज्या संस्थेकडून ही पहीक्षा घेण्यात येणार आहे. त्या संस्थेने सर्व उमेदवारांना मेल केला आहे. त्यात जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (४ सप्टेंबर) राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर रहावे. उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण परिक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करुन परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहण्याची दक्षता घ्यावी.

दरम्यान, जालन्यातील घटनेच्या पार्श्चभूमीवर उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची देखील शक्यता आहे. अशावेळी अनेक उमेदवार परिक्षेला मुकण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा मुलांची परिक्षा हुकली तर त्यांनी पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी स्पर्धा परिक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.