इरशाळवाडी गावावर दरड कोसळली :दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू

 इर्शाळवाडी दुर्घटनेतील गावकऱ्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश ; म्हणाले, “काहीही करा, पण आमच्या नातेवाईंकांचा जीव वाचवा”

मुख्यमंत्र्यांकडून मदत, बचावकार्याचा आढावा; मुख्यमंत्री घटनास्थळावर, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

खालापूर,२० जुलै /प्रतिनिधी :- खालापूरजवळील इरशाळवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. बुधवारी रात्री इरशाळगड (इरशाळवाडी) येथे दरड कोसळून ३० ते ४० घरे मलब्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे. या घटनेत १०८ जणांना वाचविण्यात यश मिळाले. 

आतापर्यंत 108 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही घटना घडली. इरसाळगडाच्या पायथ्याशी इरसाळ वाडी आहे. आणखी खालच्या बाजुला चौक नावाचे नेताजी पालकर यांचे मुळ गाव आहे. इरसाळगडाच्या पायथ्याला असलेल्या या इरसाळ वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.

याआधीही रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील ३५ घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये १५१ जणांनी आपले प्राण गमावले होते. माळीण गावावर दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील ७४ पैकी ४४ घरे दबली गेली. यामध्ये १५१ जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे.

इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.धुके, अंधार आणि संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा होत आहे. पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतेय. गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहने जात नाहीत, अर्धा तास चालत जावे लागत आहे. एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. मध्यरात्री घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. परंतु आजूबाजूच्या गावातील लोक आणि नातेवाईक कशाचीही पर्वा न करता घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

“काहीही करा, पण आमच्या नातेवाईंकांचा जीव वाचवा”

 मागील तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

या घटनेत बचावलेले नागिरक मात्र टाहो फोडताना दिसत आहेत. आपल्या नातेवाईकांची माहिती मिळत नसल्यानं कासाविस झाले आहेत. कामानिमित्त गावाबाहेर असलेले तसंच शेजारच्या गावातील लोक आता आता गावात दाखल झाले आहेत. आपल्या नातेवाईकांची माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून काहीही करा, पण आमच्या नातेवाईकांचा जीव वाचवा अशी विनंत त्यांना करत आहेत. तर आमचे सगळे नातेवाईक गेले, आम्ही काय करु? असा टाहो फोडताना लोक दिसत आहेत.

यावेळी एका आजीनं माझ्या माहेरची लोक गेली. भावजय, भावाचा मुलगा, बहीण, तिचं अख्खं कुटुंब अडकलं. बहिणीच्या घरी कुणीचं राहीलं नाही. सगळी माणसं गेली. असं म्हणत टाहो फोडला.

या गावात आपल्या मुली दिलेल्या किंवा जवळचे नातेवाईक राहत असलेले लोक याठिकाणी दाखल झाले आहेत. एका व्यक्तीने तर मी सांची माणगाववरुन आलो. माझ्या मुलीचं इथे लग्न झालं असून ती इथे राहते. माझा मुलगा देखील तिच्या सोबत असून माझ्या मुलीच्या कुटूंबात सहा माणसं आहेत. त्यातल्या कुणाशीच संपर्क झालेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

इर्शाळगड माझं माहेर असून माझ्या आई-वडिलांचा अजून तपास लागलेला नाही. त्यांना शोधलं पाहिजे, असं सांगत एका महिलेनं आक्रोश केला.

इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांकडून मदत, बचावकार्याचा आढावा; मुख्यमंत्री घटनास्थळावर, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.  यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे  उपस्थित होते.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. एनडीआरएफच्या  टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील एमआयडीसीमधील कामगार एनडीआरएफच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी येथे मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल, असे जाहीर केले. तसेच, शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी, मदतीची ग्वाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे, हे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

“इरशाळगड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता मदतकार्य गतीने होत आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतली माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचून दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचे संनियंत्रण केले.

जखमींची मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून रुग्णालयात विचारपूस

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना संबंधित रूग्णालयाला दिल्यात. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी  नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते.

शिवभोजन थाळी पॅकेटचे मोफत वितरण, अत्यावश्यक अन्नधान्यही देणार

शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वितरण दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येणार आहे. शिवाय पाच लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, इतर शिधा देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पुरवठा सुरूच राहणार आहे.

संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक

चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक काळसेकर  यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8108195554 असा आहे.

नागरिकांना आवाहन

भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.