…तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती, मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई ,२० जून /प्रतिनिधी :-सध्या राज्यात गद्दार विरुद्ध स्वाभिमान असं आंदोलन होताना दिसत आहे. ठाकरे गट आजचा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करत आहे. आजच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन शिवसेनेत उभी फूट पाडत बंड केलं होतं. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. आता मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांनी डाव यशस्वी झाला नसता तर सर्व आमदारांना परत पाठवलं असतं आणि स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. त्यांनी आमदारांसाठी जीवाची पर्वा केली नाही. यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी उभे आहोत, असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे म्हटले होते ज्यावेळी हा उठाव यशस्वी होणार नाही असं मला वाटायला लागलं. त्यावेळी मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन करुन माझी चूक झाली या लोकांची काही चूक नाही. अन् तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडली असती.” पुढे केसरकर म्हणाले की, “असं म्हणणारा माणूस कोणत्या दर्जाचा असतो. त्याच्याकडे कशा रीतीची माणूसकी असते की, माझ्यामुळे कोणत्याच आमदाराचं नुकसान होऊ नये. माझा जीव गेला तरी चालेल. लोक अशा माणसाच्या मागे उभी राहणार नाहीत तर कुणाच्या मागे उभी राहणार?” असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थितीत केला आहे.