एकापेक्षा एक अवली, इथं लवली कुणीच नाही, उद्धव ठाकरेंनी उडवली शिंदे गटाची खिल्ली

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

आपल्याकडची गर्दी पैसे देउन,भाडयाने माणसे जमवून आणलेली नाही. ५७ वर्षांची ही तपश्चर्या आहे – उद्धव ठाकरे

मुंबई ,१९ जून /प्रतिनिधी :-ठाकरे गटाने आज षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. मणिपूर येथील हिंसाचार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये सीरिया आणि लिबिया सारखी परिस्थिती निर्माण झाली असून तिथे भाजपाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “काल (रविवार, १८ जून) मी मणिपूरचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरला जायला हवं, असं मी म्हटलं होतं. तो उल्लेख मी मुद्दामहून केला होता. कारण सध्या मणिपूर पेटलेला आहे, पण आपले पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे बोलल्यानंतर मोदींचे नवगुलाम झालेले लाचार मिंधे मला म्हणाले, सूर्यावर थुंकू नका. पण कोण सूर्य? कुठला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू तुमचा सूर्य असेल, तर तो सूर्य माणिपूरमध्ये का उगवत नाही? मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? मणिपूरमध्ये तो सूर्य उगवत नसेल, तर अशा सूर्याचं करायचं काय?”

असे अंधभक्त म्हटल्यावर त्यांना लस देण्याची गरज आहे, सगळ्या मानसिक रुग्णांना समीर चौघुलेंच्या रुग्णालयात न्यावे लागणार आहे, सगळेच अवली आहे, एकापेक्षा एक अवली आहे, लवली कुणीच नाही”, असं म्हणतं ठाकरेंनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. 

आपल्याला आपल्यातल्याच लोकांनी तर आव्हान दिले आहेच, पण एकेकाळी मित्र असलेल्यानेही आव्हान दिले आहे. शिवसेनेला आव्हानांची सवय आहे. जिथे शिवसेना, तिथे आव्हान असतेच. पण आता हे शेवटचेच आव्हान. हे आव्हान मोडायचे म्हणजे मोडायचेच. हे आव्हान मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रू शिल्लक ठेवणार नाही. शिवसैनिकाच्या मदतीने आणि साथीने हे आव्हान मोडून काढणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अजूनही आपल्याकडून काही जण तिकडे जात आहेत. मला यामुळे कसलाही धक्का वगैरे बसत नाही. शिवसेना धक्काप्रूफ आहे. रोज आपल्याकडच्यांना फोन करतात. भाडोत्री-विकाऊ जे असतील, त्यांना अजूनही घेउन जा. हवे तर मला सांगा, मीच यादी देतो. तुम्ही पीक कापून नेले असेल पण शेती आमच्याकडेच आहे, असेही त्यांनी बजावले. उद्या गद्दारीला एक वर्ष होत आहे. उद्या गद्दार दिन आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेसमोरचे हे शेवटचेच आव्हान असेल. हे आव्हान मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रूच ठेवणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपल्याकडची गर्दी पैसे देउन,भाडयाने माणसे जमवून आणलेली नाही. ५७ वर्षांची ही तपश्चर्या आहे. तिकडे गारदी जमले आहेत. कोर्टाचा निकाल तर लागला आहेच. आता अध्यक्षांचाही लागेल. त्यानंतर यांना टुरिस्ट कंपनी काढून फिरावे लागेल. सोबतीला त्यांच्याकडे सूरत, गुवाहाटी फिरण्याचा अनुभव गाठिला आहेच. रेडा कुठे कापायचा. टेबलावर नाचायचे कसे. दिल्लीत मुजरा कसा करायचा हा अनुभव गाठिशी आहे. आज हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. भाजपाला जोपर्यंत त्यांचा उपयोग आहे तोपर्यंत पुंगी वाजवतील मग टोपलीत घालून कुठे सोडून देतील. सरकारचा जाहिरातीवर जितका खर्च होतोय तेवढे पैसे जरी शेतक-यांना दिले असते तरी शेतकरी खूष झाला असता असे उदधव ठाकरे म्हणाले. ते उलटया पायाचे नाही तर पळपुटया पायाचे आहेत. मी उमेद कधी हरलेलोच नाही. शिवसेनाप्रमुख आपल्याकडे बघत आहेत. ते आपली परीक्षा घेत आहेत. या संकटाला माझी फौज कशी मोडून तोडून टाकते ते शिवसेनाप्रमुख बघत आहेत असेही ते म्हणाले.

फडणवीसांचा हास्यजत्रेचा प्रयोग

‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला. व्हिडिओ दाखवत ते म्हणाले कोविडची व्हॅक्सिन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केली. कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसला कळत नाही. कोविडची लस मोदींनी तयार केली तर संशोधक काय गवत उपटत बसले होते. असे अंधभक्त व त्यांचे गुरू म्हटल्यानंतर यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे. त्यांना मानसिक रुग्णालयात समुपदेशनासाठी पाठवले पाहिजे. एकापेक्षा एक अवली आहेत लव्हली कोणीच नाही. तुम्ही अवली असलात तरी जनता कावली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.