नवाब मलिकांच्या जामिन अर्जावर सुनावणी पूर्ण ; पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता

मुंबई ,१७ जून /प्रतिनिधी :-​राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी विनंती मलिक यांच्या वकिलांनी केली. दुपारच्या सत्रात ईडीने आपली बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मलिक यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.

जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी निर्णय राखून ठेवला. पुढील आठवड्यात निर्णय जाहिर करण्याची शक्यता आहे .

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीत मलिक यांना अटक केली होती. ते किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यामुळे विशेष वैद्यकीय काळजी घेण्याची गरज असल्याचा दावा करत मलिक यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्या अर्जावर अखेर शुक्रवारी न्या. प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी मलिक यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना वैद्यकीय अहवालाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. ३० जानेवारीच्या जे.जे. रुग्णालयाच्या अहवालानुसार मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांची किडनी निकामी झाली असून ते विविध आजारांनी त्रस्त आहेत. आजारपणामुळे त्यांचे वजन १६ किलोने कमी झाले आहे. सध्या त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांना पूर्णपणे बनावट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या गंभीर प्रकृतीचा सहानुभतीपूर्व रून विचार क न्यायालयाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली.

तर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी वैद्यकीय जामीनाला जोरदार आक्षेप घेतला. खासगी रूग्णालयात वैद्यकिय उपचार सुरू आहेत. त्यांनी निवडलेल्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.