नारेगावातील विजेच्या समस्यांचे सोडवू -अधीक्षक अभियंता जमधडे यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर ,२५ मे  / प्रतिनिधी :- नारेगाव परिसरातीलविद्युत ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण केले जाईल, ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी केले.

प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार मंगळवारी (25 मे) नारेगावात ग्राहक संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी जमधडे यांच्यासह शहर-2 विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबेकर, चिकलठाणा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश तौर,चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता श्याम मोरे, सहायक लेखापाल आशिष खानापुरे यांच्यासह जनमित्र तसेच  ग्राहक व ग्राहक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वीज ख्रांब बसवावेत, शाखा कार्यालयात तक्रारवही ठेवावी, वाढती ग्राहक संख्या पाहता आणखी एक शाखा कार्यालय सुरू करावे, नवीन रोहित्र बसवावेत, वीजबिल दुरुस्त करावे, एरियल बंच केबल टाकावी, पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांना लागणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशा मागण्या ग्राहकांनी केल्या.

            यावर अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन ‍दिले.  एमआयडीसी शाखेसाठी अतिरिक्त कर्मचारी नेमले असून अनावश्यक वीजवापर टाळावा. वीज खंडितची तक्रार करताना वीजबिल भरलेले असावे. त्याचबरोबर नवीन रोहित्रासाठी नवीन जोडणीचे अर्ज जोडावेत. ग्राहकांनी  वीजबिले नियमित भरावीत. वीजचोरी करू नये आणि कुणी वीजचोरी करत असेल तर त्यांची माहिती महावितरणला द्यावी, असेही जमधडे यांनी यावेळी सांगितले.