पर्यावरणाच्या संतुलनासाठी भारताचा पुढाकार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

लखनौ,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-   हवामान बदलाची समस्या अमेरिका, युरोप किंवा चीन देश नव्हे, तर “वसुधैव कुटुंबकम” हा भाव जोपासणारा भारत देशच ही समस्या सोडवेल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच लखनौ येथे केले.

लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय हवामान संरक्षण परिषदेत ‘विधिमंडळांची हवामान संरक्षणातील भूमिका’ या विषयावरील तांत्रिक सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) ही जागतिक समस्या बनली असून पर्यावरण संरक्षण आणि वनसंपदा टिकविण्यासाठी व्यापक जागतिक जनसहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण, वन्य जीवांचे संवर्धन आणि कांदळवन वृद्धी या बाबींना आता आपण गांभीर्याने विचार करुन महत्त्व दिले पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याचा उल्लेख त्यांनी अभिमानाने केला.

वनविभागाचे महत्त्व जाणा

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पर्यावरण रक्षणाचे काम वनखात्याच्या माध्यमातून होते. महाराष्ट्र सरकारचे वनखात्याचे बजेट २०१४ मध्ये २६५ कोटी रुपये होते, ते आज २ हजार ७०० कोटी रुपये आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.