चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने वादंग :आम्ही चंद्रकांत पाटीलांच्या विधानाशी सहमत नाही; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने टोचले कान

मुंबई,११  एप्रिल / प्रतिनिधी :-  भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या विधानावर शिंदे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत म्हणाले की, “चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आणि आमचे सहकारीही आहेत. पण त्यांच्या विधानासाठी आम्ही सहमत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अशी विधाने करणे योग्य नाही. चंद्रकांत पाटील यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उदय सामंत पुढे म्हणाले की, ” बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा शिवसैनिक तिथे उपस्थित होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, लाल कृष्ण अडवाणी यांच्यावर गुन्हे करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे, स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी सर्वात आधी याचे समर्थन केले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी पाडली असेल, तर मला अभिमान आहे. १९९३मध्ये दंगल झाली, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंमुळे आटोक्यात आली.” असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे कां टोचले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख आदराने केलेला आहे. मोदी बाळासाहेबांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजे भाजपचे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी बोलणार आहेत.” असेदेखील उदय सामंत यांनी सांगितले. तर, “दाऊदशी संबंध असणारे मंत्री जेलमध्ये असताना त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे आता त्या लोकांनी राजीनामा मागण्याच्या अधिकार नाही,” असे म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.