कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे, १३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, राजू पाटील, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, आदी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील एमएमआरडीएच्या वतीने ४४५ कोटीच्या २४ विविध रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन यावेळी झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. खड्डेमुक्त रस्ते हे या शासनाचे ध्येय आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते असावे ही जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते करण्यावर भर देत आहोत. राज्यात समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, वसई विरार मल्टिमोडल रोड असे अनेक प्रकल्प राज्य शासनाने प्राधान्याने घेतले असून ते वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबई पुणे महामार्गावर जगातील रुंदीने सर्वात मोठा टनेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात येत आहे. असे प्रकल्प राज्यासाठी कायापालट करणारे आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या जाळ्यामुळे खासगी वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होईल. एमएमआरडीए ला प्रकल्पासाठी साठ हजार कोटींच्या निधींसाठी परवानगी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आणखी मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शीळ फाटा रस्त्याला पर्यायाचा विचार करत आहोत. शिळ फाटा ते भिवंडी मल्टिलेव्हल रस्ता करणार आहोत. या शहराला आणखी चांगले करण्यासाठी जेजे करता येईल ते करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.
हे सरकार लोकांचे आहे. लोकांसाठी जे जे करता येईल ते करण्यासाठी मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सबका साथ सबका विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १८ तास झटत आहेत. सामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंदाचा शिधा वाटप केले. पुढील चार सणांना सुद्धा हा शिधा वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कल्याण डोंबिवली मधील सर्व रस्ते लवकरच सिमेंट चे करण्यात येणार आहेत.
सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम हे शासन करत आहे. विकासाचे रथ घेऊन निघालेल्या या सरकारच्या पाठीशी सर्व जनता असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवली च्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. या परिसरातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी ४४५ कोटींची कामांचे भूमिपूजन आज करत आहोत. याशिवाय या भागासाठी शीळ फाटा ते राजनोली रस्ता, शीळ फाटा येथे ग्रेड सेपरेट, दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड मोठगाव पर्यंत आणणे, मेट्रो असे अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर चा चेहरामोहरा बदलणार आहे.

कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज डोंबिवलीमधील डोंबिवली पूर्व गजानन चौक ते ( नांदिवली) नाला पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, शिळ रस्ता ते संदप उसरघर रस्ता काँक्रीटीकरण, डोंबिवली पूर्व मानपाडा रस्ता (स्टार कॉलनी ते समर्थ चौक रस्ता) काँक्रीटीकरण, उंबार्ली पाईपलाईन से उंबार्ली स्मशानभूमीपर्यंत रस्ता तयार करणे यांच्यासह २४ रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले.