राम मंदिर, अयोध्या आमच्यासाठी राजकीय विषय नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं, यांची तर तारीखच निश्चित होत नव्हती…

अयोध्या ,९  एप्रिल / प्रतिनिधी :-  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अयोध्या दौऱ्यातील शेवटचा दिवस असून यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “राम मंदिर, अयोध्या हा आमचा राजकीय विषय नाही. हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. विकासाची अनेक कामे होत आहेत. याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले पाहिजेत. आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. हा माझ्या आयुष्यातील सौभाग्याचा दिवस आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अयोध्याचं वातावरण भगवे झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. मंदिर वही बनायेंगें तारीख नही बतायेंगेच्या फुका घोषणा करण्यांचा समाचार यावेळी एकनाथ शिंदे यांनी घेतला. ते म्हणाले, हे कधी मंदिर बांधणार याची तारीख त्यांच्याकडून निश्चित होत नव्हती. पण नरेंद्र मोदी यांनी हा संकल्प केला व सिद्धीस नेला, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर बांधण्यात नरेंद्र मोदी यांचे योगदान जनतेसमोर मांडले.

“अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा अयोध्यामधील राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. राम जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळेच वलय जाणवले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मंदिराचे काम हे अतिशय वेगाने सुरु आहे.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, “२०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेनेला मते दिली होती. पण, काही लोकांनी स्वार्थापोटी कौल नाकारला. सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला तिलांजली दिली.” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “माझ्या अयोध्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होतो आहे. ते मुद्दामहून टीका करत आहेत. खरं तर, काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जीच आहे. पण पंतप्रधान मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. पण काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज निर्माण करत आहेत.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

बळीराजावरचं संकट दूर व्हावं, जनतेच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत यासाठी प्रार्थना आम्ही केली आहे. तसेच श्री राम लल्लांच दर्शन घेऊन येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करु असेही मुख्यंमत्र्यांनी यावेळी सांगितले.