शेतकरी दुःखात, पण मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर-विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर,९  एप्रिल / प्रतिनिधी :-  एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २ दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. “एकीकडे शेतकरी अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा कितपत योग्य?” असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच, ठाकरे गटाचे नेते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहेत.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी दु:खात आहेत. असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करत आहेत.” अशी टीका केली. तसेच, “शिवसेना ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.” असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, “गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटदेखील झाली आहे. मात्र, अद्याप पंचनामे झाले नाहीत. राज्यातील जनता जर सुखी नसेल, तर विमानाने देवाच्या दर्शनासाठी जाणे हे पटते का?” अशी टीका त्यांनी केली.