कोविडमध्ये अनेक शिवसैनिक गेले तेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यात फिरकले नाहीत

नरेश म्हस्के यांचा महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार

ठाणे ,५  एप्रिल / प्रतिनिधी :-   कोविडमध्ये अनेक शिवसैनिक गेले पण उद्धव ठाकरे ठाण्यात फिरकले नाहीत, असा जोरदार प्रहार ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला आहे.

ज्या जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचा फोटो खड्ड्यात बुडवला होता. बाळासाहेब ठाकरेंवर चुकीच्या शब्दांमध्ये ज्यांनी टिपण्णी केली होती अशा आव्हाडांना सोबत घेऊन मोर्चा काढला जातो आहे, या शब्दात उद्धव ठाकरेंकडे माणसे नाहीत, ठाण्यात आणायला त्यामुळेच मुंबई, रायगड या ठिकाणाहून माणसे आणली गेली आहेत. जो खोटा आव आणत आहेत, तो बुरखा फाटला आहे. मारहाण झालेली नाही असे सिव्हिल रूग्णालयाने आधीच म्हटले आहे. त्यामुळे मारहाण झाली असल्याचा दावा असत्य ठरला आहे, असे त्यंनी यावेळी सांगितले. आमचा संयम सोडू देऊ नका.

कित्येक शिवसैनिक कोविडमध्ये गेले पण तेव्हा उध्दव ठाकरे आले नाहीत. आता खोट्या माहितीवरून आले अशी जोरदार टीका करत आमचा संयम सोडू देऊ नका असे नरेश म्हस्के यांनी सुनावले. उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन रोशनी शिंदे यांची विचारपूस केल्याने राजकारण चांगलंच तापले आहे. त्यावरून आज नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे नेते महिलेच्या पडद्याआड लपून आमच्यासमोर येत आहे. लोकांची सहानुभूती घेत आहेत. खासदार राजन विचारे यांनी कट रचला आणि बनाव केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. रोशनी शिंदे यांना पुढे करून अत्यंत वाईट पोस्ट टाकली आहे. प्रेग्नेंट महिलेला मारहाण म्हणून खोटी माहिती विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचेही नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मोर्चामुळे ठाण्यात वाहतुकीचे तीन तेरा

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिस निष्क्रिय असल्याचा आरोप करत आज ठाण्यात महाविकास आघाडीकडून शहर पोलिस आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामुळे ठाणेकर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी मार्ग बदलल्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला होता. दरम्यान, ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या या मोर्चाला त्या तुलनेत तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. यावेळी गर्दी जमविण्यासाठी भाडोत्री कार्यकर्ते शेजारच्या जिल्ह्यातून आयात केले असल्याचा आरोप शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी केला आहे.