सत्ताधारी आमदारांना सत्तेची मस्ती आली का? – अजितदादा पवार

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

मुंबई ,१७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आजपासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी चहापानावर बहिष्कार टाकत असून त्याची कारणे काय आहेत, याचे सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अजितदादा यांनी सांगितले. तसेच यावेळी माजी आमदार विनायक मेटे आणि पहलगाम येथील अपघातात शहीद झालेल्या आयटीबीटी जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झालेली असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. हे मुद्दे आम्ही सभागृहात मांडणार आहोत. अतिवृष्टी झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी करणार आहोत. तसेच एनडीआरएफचे निकष कालबाह्य झालेले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना तिप्पट मदत दिली असल्याची आठवण अजितदादांनी करुन दिली. या सरकारने दुप्पट मदत दिल्याचा दावा केला असला तरी त्यात तथ्य नाही, अशी टीका अजितदादा यांनी केली.

राज्यात साधारण १५ लाख हेक्टर शेतजमिनीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. सरकार कुणाचेही असले तरी शेतकऱ्यांना भरीव मदत करुन ताठ मानेने त्यांना जगण्यासाठी मदत करायला हवी, अशी भूमिका अजितदादांनी मांडली.

कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलत असताना अजितदादा पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या वक्तव्यांवर ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षातले काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा, अशी भाषा वापरत आहेत. हात पाय तोडण्याची भाषा केली जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून सुसंस्कृत राजकारणाचा पाठ आपल्याला घालून दिला होता. त्यांच्या महाराष्ट्रात तोडफोडीची भाषा आपल्याला शोभते का? शिंदे-फडणवीस यांना ही भाषा योग्य वाटते का? शिंदे गटाच्या एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याच्या कानशिलात पेटवली. तुम्हाला सत्तेची मस्ती आली का? असा परखड प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला.

राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणून त्यावर चर्चा केली जात आहे. महाराष्ट्रात दोन व्यक्ती भेटल्यानंतर विविध प्रकारे अभिवादन केले जाते. मात्र आता वंदे मातरम् बोलण्यास सांगितले जात आहे. वंदे मातरमला विरोध असण्याचे काहीही कारण नाही. पण सरकारमध्ये नसताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या विसरुन जायचं, त्यावर काहीच बोलायचं नाही, राज्याच्या प्रश्नांवर बोलायचं नाही, अशी पद्धत अवलंबली गेली असल्याची टीका अजितदादांनी सरकारवर केली.