रोशनी शिंदे यांच्या मारहाणीच्या विरोधात ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा

गुंडांचे सरकार आले असून ते सरकार आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही-आदित्य ठाकरे

ठाणे,५  एप्रिल / प्रतिनिधी :-  रोशनी शिंदेला मारहाण प्रकरणी पोलीस काय करत आहेत? असा सवाल करत महाविकास आघाडीने आज ठाण्यात मोर्चा काढला आहे. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनीही आम्ही पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच रोशनी शिंदे यांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

या मोर्चात आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. आम्ही महाराष्ट्रात गुंडांचे सरकार राहू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जो कायदा पोलिसांनी पाळला पाहिजे तो पायदळी तुडवला जात आहे. आयपीएस झाल्यावर पोलिस अधिकारी निःपक्षपातीपणे काम करण्याची शपथ घेतात. ते कधीच दिसत नाही. एखाद्या समूहावर अन्याय कायम ठेवण्याची प्रवृत्ती दिसते. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. रोशनी शिंदे हिला मारहाण झाल्याची अत्यंत घृणास्पद घटना ठाण्यात घडली आहे. आमचा लढा अन्यायाविरुद्ध आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त बेपत्ता आहेत. गुंडांचे सरकार आले असून ते सरकार आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.