साईबाबांविरोधात बागेश्वर बाबांचं वादग्रस्त विधान:कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही

जबलपूर: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे बागेश्वर बाबा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही तसंच कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला असून धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.