हिंमत असेल तर सावरकरांच्या मुद्द्यावर मविआतून बाहेर पडा-चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. पण तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच सावरकरांच्या भूमिकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत थेट आव्हानच दिले आहे. सावरकरांबाबत एवढाच कळवळा आहे तर उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर करावे. उद्या घ्यावी पत्रकार परिषद आणि सांगावे, असे आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना ५० वेळेला काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात धमक असेल तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे, नुसत्या तोंडाच्या वाफा काढू नका, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.

बावनकुळे यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत टीका केली. ५२ काय १५२ कुळे खाली उतरली तरी शिवसेना बुडवू शकणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी आजवर एकही निवडणूक लढली नाही, यावरून बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली. जे उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही. मागच्या दाराने विधानपरिषदेत गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही त्यांनी निवडणुकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील २०० जागा जिंकून येऊ, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.