औरंगाबाद शहरात विशेष स्वच्छता मोहीमचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- महानगर पालिकेचे आयुक्त राहिलेले आस्तिक कुमार पाण्डेय हे जिल्हाधिकारी म्हणून तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहिलेले अभिजीत चौधरी हे मनपाचे आयुक्त म्हणून लाभले आहेत तर माझ्यासारखा कमी बोलणारा आणि जास्त काम करणारा पालकमंत्री औरंगाबाद जिल्ह्याला मिळालेला आहे. जी- २० हे निमित्त मात्र असून अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने  जिल्ह्याचा व शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही ,असा विश्वास पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. 

शहरात होणाऱ्या जी- २० , डब्ल्यू -२० बैठकीच्या निमित्ताने  दिनांक ११ व १२  फेब्रुवारी या दोन दिवशी स्वच्छता अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते क्रांती चौक ध्वजस्तंभ येथे आज शुक्रवारी सायंकाळी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सोमनाथ जाधव, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी आदीसह नागरिक उपस्थित होते.संघटना संघ, औरंगाबाद (Team of Associations, Aurangabad) ज्यामधे शहरातील विविध संघटना अनौपचारिकपणे एकत्र आल्या आहेत व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात येईल.‌अभियान राबविण्यासाठी शहर ९ भागात विभागले गेले आहे. ९ भागातील विविध रस्त्यांवर मनपा स्वच्छता अधिकारी व संघटना संघाचे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. समाजातील सर्व स्तरात अभियानाचा प्रचार प्रसार करण्यात आला आहे.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले की जी-२०च्या निमित्ताने शहरात स्वच्छता, सौंदर्यकरण आणि रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात येत आहे. माझ्या  कारकिर्दीत शहराच्या विकासासाठी एवढा मोठा सहभाग आणि उत्साह कधी पाहिला नाही तो जी -२० च्या निमित्ताने आज दिसून आला. औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राहिलेले आस्तिक कुमार पाण्डेय हे जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला लाभले असून त्यांना शहराचा चांगला अभ्यास आहे.  जी -२० बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या सौंदर्यकरण, सुशोभीकरण ,रंगरंगोटी , रोषणाई आदी विकासासाठी ५० कोटीचा निधी दिला आहे .जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय  व मनपा आयुक्त अभिजीत चौधरी हे अतिशय मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने रस्ते, स्वच्छता व सौंदर्यकारणाचे काम करत आहेत. विकासाच्या दृष्टीने चांगल्या अधिकाऱ्यांची दखल घेतली जाते.जिल्ह्याला व शहराला चांगले अधिकारी लाभले असल्याने पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांचे कौतुक केले. शहराच्या विकासाबरोबरच पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुणे औरंगाबाद रस्ता सहा पदरी  आणि पैठण  रस्ता चार पदरी रस्त्याचे काम सुरू असून लवकर हे रस्ते पूर्ण होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने येणाऱ्या या बजेटमध्ये  वाटर पार्क व उद्यानासाठी दीडशे ते दोनशे कोटीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्ह्याची विकासासाठी आपण पाहिजे तेवढा वेळ देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री भुमरे यांनी दिली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आस्तिक पाण्डेय म्हणाले की, याच महिन्यात जी-२०, डब्ल्यू -२० बैठक शहरात होत आहे.या जी- २० चे निमित्ताने शहराच्या सौंदर्यकरणासाठी शासनाने 50 कोटीचा निधी दिला आहे . सौंदर्य करणाचे काम लवकरच पूर्ण होईल. मात्र शहर  विकासाच्या, सौंदर्य करण्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांनी हातात हात घालून शहराचा कायापालट करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.यावेळी पालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी म्हणाले की जी 20 चे निमित्ताने शहराला संधी मिळाली असून शहरात बदल होत आहे.शहरात दिनांक 11, 12 फेब्रुवारी  दोन दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

 शहराच्या स्वच्छतेसाठी आणखी वीस घंटा गाड्यांचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.आयोजकांतर्फे प्रसाद कोकिळ व जगन्नाथ काळे यांनी मनोगत व्यक्त केले. हेमंत लांडगे यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.सावित्रीबाई फुले एकात्मता मंच व सरस्वती भुवन कला विभागाच्या संघांनी स्वच्छतेचा संदेश देणारी पथनाट्य सादर केली.संजय कांकरिया यांनी पालकमंत्र्यांचे व नितिन गुप्ता ह्यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले.

२० नवीन घंटा गाड्यांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.याप्रसंगी मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी सौरभ जोशी, संघटनांतर्फे नितिन गुप्ता, अनिल पाटील, भगवान राऊत, अर्पित सावे, लक्ष्मीनारायण राठी, शिवशंकर स्वामी, जयंत देवळाणकर, आदेशपाल सिंह, प्रभंजन महीतोले, हर्षवर्धन कराड, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. शांतिलाल सिंघी, बाळकृष्ण भाकरे, मनपा झोन अधिकारी, स्वच्छता स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.