अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट

राज्यपाल यांच्यासोबत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची आज (गुरुवारी) बैठक

मुंबई, दि.२ : अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात आज सकाळी ११ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापींठाचे कुलगुरू यांची बैठक होणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही,अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूसोबत  झालेल्या बैठकांची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल महोदय यांना दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपाल महोदय यांनी यावेळी केल्या.

श्री. सामंत म्हणाले, उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपाल महोदय यांच्या सोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल आणि समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ची सद्यस्थितीत आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन  कळविण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *