शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.  समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी समृद्धी उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृद्धी महामार्गामुळे शिर्डीत देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

राज्याच्या दरडोई उत्पन्नात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार लाभला आहे. अहमदनगर जिल्हा साखरेचे कोठार आहे. कृषिदृष्टया संपन्न जिल्हा आहे. दळण-वळण साधनांअभावी जिल्ह्यातील काही भाग विकासापासून मागे राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग शिर्डी परिसर व अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे.

अहमदनगर १० जिल्ह्यांशी प्रत्यक्ष व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडले जाणार

समृद्धी महामार्गात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्‍यातील १० गावे येतात. जिल्ह्यातील या रस्त्याची लांबी धोत्रे ते दर्डे कोऱ्हाळे ( २९.४० किमी ) इतकी तर रुंदी १२० मीटर इतकी आहे.  समृध्दी द्रुतगती मार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर मुंबईपासून शिर्डी येण्यास अवघे दोन तास लागतील. नागपूरहून शिर्डी येण्यास अवद्ये ५ तास लागतील. समृध्दी महामार्गाला अहमदनगरशी जोडणारा मनमाड-नगर रस्त्याच्या कामास जानेवारी २०२३ पासून सुरूवात होत आहे. हा रस्ता डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समृध्दी महामागापर्यंत पोहचण्यासाठी वेगवान संपर्क उपलब्ध असणार आहे. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने, कृषी उद्योग, दूध व्यवसाय, भाजीपाला, फळे-फुले पिकविणारे शेतकरी व व्यावसायिकांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे.