गुजरातच्या मोरबीत पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू ; पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्याचा पंतप्रधानांचे निर्देश

मोरबी :-गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल कोसळला  असून त्यात 140 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

गुजरातमधील मोरबी येथे काल संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या अपघातात 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 400 हून अधिक लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि गरूड कमांडो घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. दरम्यान, या पुलाची १५ दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाची देखभाल करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे.

100 लोकांची क्षमता असलेल्या पुलावर अपघात झाला त्यावेळी 400 लोक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचाव कार्यासाठी तातडीने पथके पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. मोरबीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू हा पूल होता. मोरबीतील मच्छू नदीवर बांधलेला हा झुलता पूल एक, दोन वर्षे जुना नाही, तर 140 वर्षे जुना आहे. या पुलाचा इतिहास सुमारे 140 वर्षांचा आहे. या पुलाबद्दल बोलायचे झाले तर ते गुजरातमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा झुलता पूल आहे. रविवारी या पुलावर 500-700 लोक जमा झाल्याने पुलाचा भार सहन न झाल्याने पूल कोसळून नदीत पडला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मोरबी इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक

गांधीनगर:-राजभवन, गांधीनगर इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, आज मोरबी इथल्या परिस्थितीचा  आढावा घेण्यात आला.

मोरबी इथे अपघात घडल्यापासून घटनास्थळी करण्यात येणाऱ्या बचाव आणि मदतकार्याबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा, पीडितांना शक्यतो सर्व मदत केली जावी यावर भर दिला.  

या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गृहराज्य मंत्री हर्ष सांघवी, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक तसेच, गुजरातच्या गृह मंत्रालयातले आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उच्चाधिकारी उपस्थित होते.