तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा- जयंत पाटील

मुंबई ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार अजूनही नुकसान भरपाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तिथे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लवकरच गुजरात राज्याच्या निवडणुका आहेत. आम आदमी पक्ष तिथे निवडणूक लढवत आहे. आपण हिंदू देवांना मानतो हे सांगण्यासाठी कदाचित गणपती आणि लक्ष्मी देवीचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी त्यांनी केली असेल, असे सांगतानाच महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवर आहे त्याला जगात मान्यता आहे. आता सर्वचजण देवदेवतांचे, महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी करत आहे. यामुळे कारण नसताना वाद निर्माण होईल. त्यामुळे आता जे आहे तेच सुरू असायला हवे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.