माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात एक कोटींहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी-आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई ,१​६​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्यातील महिलांचा माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रापासून सुरू असलेल्या या अभियानात आतापर्यंत सुमारे १ कोटी ४ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, हे अभियान १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे व पुढेही पाठपुरावा केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले .

राज्‍यात १८ वर्षावरील महिला, माता, गर्भवती यांच्‍या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक २६ सप्टेंबर पासून आरोग्‍य तपासणी कार्यक्रम एकात्मिक बाल विकास विभाग , व इतर विभाग यांच्‍या समन्‍वयाने राबविण्‍यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील महिलांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्‍यातील १८ वर्षावरील महिलांना, मातांना, गर्भवतींना प्रतिबंधात्‍मक आणि उपचारात्‍मक आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्‍यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्‍ध करुन देणे उद्दिष्‍ट आहे.

सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैदयकिय अधिकारी आणि स्‍ञीरोगतज्ञामार्फत १८ वर्षावरील महिलांची, नवविवाहीत महिला, गर्भवती यांची तपासणी , औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची सुरवात करण्यात आली. आशा/अंगणवाडी आरोग्‍य सेविका/सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्‍ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्‍च रक्‍तदाब, मोतीबिंदू, काननाकघसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्‍ये अतिजोखमीच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्‍तीत जास्‍त महिलांची आरोग्‍य तपासणी, शस्‍ञक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच भरारी पथका मार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेञात येणार्‍या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्‍याण विभागाच्‍या समन्‍वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात येत आहेत. यासाठी अंगणवाडी आणि आशा यांना जास्‍तीत जास्‍त महिला व माता यांना याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

अभियानाबाबत थोडक्यात

आतापर्यंत एकूण 1,04,36,941 महिलांची तपासणी करण्यात आली.

३० वर्षावरील 93871 महिलांना मधुमेह तर 155707 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे प्राथमिक निदानातून आढळून आले.

एकूण 1035639 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 45732 मातांना उच्च रक्तदाब आढळून आला तीव्र रक्तक्षय असलेल्या 38509 मातांना आयर्न सुक्रोज देण्यात आले 100391 मातांची सोनोग्राफी करण्यात आली.

तीस वर्षावरील 12007 महिलांना हृदयासंबंधित आजार असल्याचे आढळून आले तर 20463 लाभार्थ्यांना कर्करोगची संशयित लक्षणे आढळून आले.

2655310 लाभार्थ्यांना मानसिक आरोग्य, तंबाखू सेवन करु नये याबाबत समुपदेशन करण्यात आले.

अभियानात केल्या जात असलेल्या तापसण्या

१) वजन व उंची घेऊन BMI काढणे (सर्व स्तरावर)
२) Hb% ,urine examination,blood sugar (सर्व स्तरावर)
३) प्रत्येक स्तरावर HLL मार्फत व संस्था स्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार)
४)chest Xray – (ग्रामीण रुग्णालय व पुढील संस्थेत)
५) mammography (आवश्यकतेनुसार)
६) कर्करोग स्क्रीनिंग, रक्तदाब स्क्रीनिंग , मधुमेह स्क्रीनिंग (३० वर्षावरील सर्व महिला )
७)RTI – STI ची तपासणी
८) माता व बालकांचे लसीकरण
९) स्तनपान
१०) व्यसन मुक्ती