पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही-राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कठोर कारवाईचा इशारा

मुंबई ,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पुण्यात पीएफआय संघटनेवरील कारवाईच्या निषेधार्ह कट्टरपंथीय तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी या आंदोलकांना अटक केली असता ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला. याची राज्याच्या गृहविभागाने गंभीररीत्या दखल घेतली असून अशा घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
 
 
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाकिस्तान जिंदाबादची घोषणा जर कोणी महाराष्ट्रात आणि देशात देणार असेल तर त्याला सोडणार नाही. अशा घोषणा देणारे जिथे कुठे लपून बसतील तिथून शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली, असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 
 
 
पीएफआयवर कारवाई झाली याचा अर्थच हा आहे की, मोठ्याप्रमाणात यासंबंधीचे पुरावे एनआयएकडे, एटीएसकडे आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळसारख्या सरकरनेही पीएफआयवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे. आता चौकशी सुरु आहे. अनेक गोष्टी त्यातून बाहेर येतील. यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती त्यात देशात अवस्थता निर्माण करण्याचे जे षडयंत्र होतं ते बाहेर येईल,  असेही फडणवीस म्हणाले.