दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची हायकोर्टात धाव:आज सुनावणी

मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद आता हायकोर्टात पोहचला आहे. पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेच्या ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. ‘अर्ज केल्यानंतर ७२ तासांत परवानगी अपेक्षित असताना, पालिकेने एक महिना होऊनही परवानगी दिलेली नाही. परिणामी आम्हाला न्यायालयात येणे भाग पडले आहे’, अशी कैफियत मांडत तत्काळ परवानगी देण्याचा आदेश पालिकेला देण्याची विनंती शिवसेनेने याचिकेत केली आहे. याबाबत न्या. रमेश धनुका व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर आज, गुरुवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे.

५ ऑक्टोबरला दसरा मेळावा असून, पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणेही आवश्यक आहे. मात्र, परवानगी देण्याबाबत महापालिका वेळकाढूपणा करत आहे, हे लक्षात घेऊन शिवसेना व शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी अॅड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत ही रिट याचिका केली आहे. याचिकेत मुंबई महापालिका, महापालिका आयुक्त व जी-उत्तर प्रभागाचे सहायक आयुक्त यांना प्रतिवादी केले आहे. अॅड. जोएल यांनी बुधवारी याचिकेच्या विषयाची प्राथमिक माहिती दिल्यानंतर खंडपीठाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आज, गुरुवारी तातडीची सुनावणी ठेवली. या सुनावणीत शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील अॅस्पी चिनॉय हे बाजू मांडणार आहेत.

‘बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी २० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. त्यानंतर दसरा मेळाव्याची प्रथा पडली आणि संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरूनही शिवसैनिक दरवर्षी उत्स्फूर्तपणे शिवाजी पार्कमध्ये येऊ लागले. इतक्या वर्षांची ही परंपरा आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने त्या ठिकाणी खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना बंदी घालावी, अशा विनंतीची जनहित याचिका २००९मध्ये उच्च न्यायालयात आल्यानंतरही न्यायालयाने २०१०पासून पुढे शिवसेनेला सशर्त परवानगी दिली. २०१५मध्ये मनसेने न्यायालयात विरोध दर्शवला असतानाही न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. त्यानंतर राज्य सरकारने २० जानेवारी २०१६ रोजी एमआरटीपी कायद्याच्या कलम ३७(अ) अन्वये अधिसूचना काढून शिवाजी पार्कवर वर्षभरात विशिष्ट कार्यक्रमांनाच परवानगी दिली. त्यातही दसरा मेळाव्याचा स्पष्ट उल्लेख आहे. २०१६पासूनही पालिका नियमित परवानगी देत आली आहे. करोना संकटामुळे शिवसेनेने २०२० व २०२१ या वर्षांत दसरा मेळावा घेण्याचे टाळले. यंदा परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर पालिकेने खरे तर ७२ तासांतच परवानगी देणे अपेक्षित होते. मात्र, जवळपास महिना उलटूनही अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव न्यायालयात दाद मागावी लागी आहे’, असे म्हणणे शिवसेनेने याचिकेत मांडले आहे.