जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का; माजी उपमुख्यमंत्र्यांसह ६४ नेत्यांचा राजीनामा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नाव नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील ६४ नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तारा चंद यांच्याशिवाय माजी मंत्री माजीद वाणी, डॉ. मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या या सर्व ६४ नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एकत्रित राजीनामे सादर केले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या राजीनाम्यावर गुलाम नबी आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आझाद म्हणाले, “सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील.”

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाची संपूर्ण सल्लागार यंत्रणा “उध्वस्त” केल्याबद्दल आझाद यांनी त्यांच्यावर टिका केली. ते लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरू करणार आहेत. अनेक माजी मंत्री आणि आमदारांसह अनेक प्रमुख काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थेचे (पीआरआय) शेकडो सदस्य, नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांनी आधीच काँग्रेस पक्ष सोडून आझाद यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याचे काँग्रेस पक्षात तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर दुःख व्यक्त करत काँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज बोलून दाखवली होती. याच पार्श्वभूमीवर आझाद यांच्या समर्थक ६४ काँग्रेस नेत्यांचे राजीनामे अत्यंत महत्वाचे ठरतात.