शिवराई जवळ अपघातग्रस्त ट्रकला स्कॉर्पिओची धडक ; एक जण ठार, चार जखमी

वैजापूर,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- रस्त्यावर पलटी झालेल्या झालेल्या अपघातग्रस्त ट्रकला भरघाव स्कॉर्पिओ कारची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. नागपूर- मुंबई महामार्गावरील शिवराई गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. 
नागपूर- मुंबई महामार्गावर असलेल्या शिवराई गावाजवळ एक ट्रक रात्रीच्यावेळी पलटी झाला. रस्त्याच्या कडेला पलटी झालेल्या या अपघातग्रस्त ट्रकला औरंगाबादकडे जाणाऱ्या भरघाव स्कॉर्पिओ कारने (एम.एच.16, ए.टी.8627) धडक दिली. या अपघातात कारमधून प्रवास करणारा राकेश बाबासाहेब ओहळ (32) तरुण जागीच ठार झाला तर आजीनाथ पुंडलिक शिंदे (50),अमोल शांतीग्राम राखोडे (45), कमलेश कैलास पाटील (48) व भास्कर गणपतराव कुबरहंडे (47) हे चौघेजण जखमी गंभीर झाले. स्कॉर्पिओ कार मधून प्रवास करणारे हे पाच ही जण औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मित्राला भेटण्यासाठी ते गेले होते. परत औरंगाबादकडे येत असताना शिवराई गावाजवळ हा अपघात घडला.

जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे, पोलीस नाईक किसन गवळी, प्रशांत गीते, गणेश पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.