ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे – विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी

  • ग्रामीण भागातील 6 लाख विद्यार्थी घरच्या तिरंगासाठी उत्सुक
  • नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी विविध उपक्रम
  • जिल्हा परिषदेत बचतगटांचा गौरव व तिरंगाचा प्रातिनिधीक शुभारंभ

नांदेड ,​५​ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कोरोनाच्या कालावधीत हिरमुसलेले विद्यार्थी आता नियमित शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रमाप्रतीही तेवढेच उत्सूक आहेत. शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.

May be an image of 7 people, people standing and text that says "हर घर तिरंगा महोत्सव शिवशंकर"

जिल्हा परिषदेत आज घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या ग्रामीण भागातील प्रभावी आयोजनाचा शुभारंभ व जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून घेण्यात आलेल्या तिरंगाचे प्रातिनिधीक वाटप करण्यात आले. या छोटेखाणी समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 6 लाख 86 हजार 821 विद्यार्थी संख्या आहे. जवळपास 24 हजार 343 शिक्षक आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत वेळोवेळी शिक्षकांवर विविध जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांनी समर्थपणे पेलून दाखविल्याचे गौरवउद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी काढले.

सैनिक हा देशाचा श्वास तर शिक्षक हा देशाचा विश्वास असल्याचा उल्लेख या समारंभात शिक्षकांनी केला होता. याचा धागा पकडून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घरोघरी तिरंगाचा आणि भारतीय स्वातंत्र्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रशासनातर्फे टाकलेला विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवाल, असे सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामपातळीवरील ग्रामसेवकापासून, शिक्षकांपासून ते तालुका पातळीवरील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांच्या परस्पर समन्वयातून घरोघरी तिरंगासाठी व्यापक नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

५०हजार शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दीड लाख गरिब कुटुंबासाठी तिरंगा वाटपाचा शुभारंभ

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्याने “घरोघरी तिरंगा” अभियानासाठी अभिनव व कल्पक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबालाही आपल्या घरावर स्वाभिमानाने तिरंगा फडकविता यावा यासाठी शासनाच्या सुमारे 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन या प्रमाणे सुमारे दीड लाख तिरंगाचे वाटप केले जात आहे. त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष विजय जोशी, उर्दू संपादकांच्यावतीने अल्ताफ सानी, संपादक प्रदिप नागपूरकर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील बचतगटांना आपण जाणीवपूर्वक तिरंगा वितरणाची, तिरंगा विक्री करण्याची जबाबदारी दिली आहे. सुमारे दीड लाख तिरंगा त्यांच्यामार्फत आपण घेत आहोत. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय परिसरात त्यांना तिरंगा विक्रीसाठी जागाही देत आहोत. अप्रत्यक्षरित्या त्यांना यातून मदत व्हावी हा उद्देश आहे. तिरंगाबाबत शासनाचे निर्देश व त्याबाबतच्या नियमांची स्पष्ट कल्पना सर्वांना दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभिनव उपक्रमासाठी माध्यमांचे प्रतिनिधी आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास तत्पर आहेत. या उपक्रमात लोकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यासाठी व्यापक प्रसिद्धीवर आम्ही भर देऊ असे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी सांगितले.

यावेळी प्रातिनिधी स्वरुपात उपस्थित सर्व सन्माननिय पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना तिरंगा देण्यात आला. प्रत्येक शासकीय अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या योगदानातून गरीब तीन कुटुंबांना तिरंगा देणार आहेत.