औरंगाबादचे संभाजीनगर नकोच : इम्तियाज जलील

औरंगाबाद,१६ जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये १६ जून रोजी तब्ब्ल दीड तास राज्याच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या निर्णयावर बैठक पार पडली. यामध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे, तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याचा निर्णय झाला. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयांवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.

Image


 
 
“शिवसेना असो की भाजप सर्वांनीच राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला आहे. औरंगाबादचे नामांतर करून छत्रपती संभाजींचं नाव देण्याची घोषणा त्याचाच एक उदाहरण आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय हवे होते.” असे इम्तियाज जलील म्हणाले.

“राजकीय स्वार्थ साधला गेला असेल, मनाला शांती मिळाली असेल तर औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार हे सांगावे. ज्या शहराला महापुरुषाचे नाव दिले आहे, त्या शहराला दहा दिवसांतून एकदा पाणी मिळते. आमच्या युवकांना नोकऱ्या कधी मिळणार? इथे उद्योग कधी आणि किती येणार? आज युवकांना रोजगार महत्त्वाचा आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सात वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराला इंटरनॅशल इन्स्टीट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग देणार आहोत, अशी घोषणा केली होती. ते कधी देणार आहात?” असे प्रश्न जलील यांनी सत्ताधाऱ्यांना केले.

“औरंगाबाद शहरामध्ये उभारले जाणारे क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवण्यात आले. मोठी शिवसेना, छोटी शिवसेना तसेच भापजा हे सगळे त्यावेळी गप्पा बसले होते. त्यामुळे हे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला कधी मिळणार हे सांगावे. नाव बदलून काय साध्य केले, हे आम्हाला येणाऱ्या काळात पाहायचे आहे,” अशी घणाघाती टीका जलील यांनी केली.

“आपण आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी, मोठी शिवसेना, छोटी शिवसेना, काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नाचत आहेत. हे नाव बदलल्यानंतर आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड या सर्व कागदपत्रांमध्ये बदल करावा लागणार आहे. यासाठी आपण पैसे देणार आहात का? सामान्य नागरिकांना रांगेत उभे राहावे लागणार आहे का?” असा सवाल करत त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीका केली.

“शहराचे नाव बदलायचे असेल, तर त्या शहरातील लोकांची भावना काय आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. औरंगाबादचा काहीही संबंध नसणारे मुंबईत बसून निर्णय घेत आहेत. इतिहास चांगला असो किंवा वाईट तो पुसता येत नाही, असे म्हणत जलील यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला.