स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन साजरी करा बकरी ईद; धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा!
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा – धनंजय मुंडे
परळी/बीड(दि. ३१) —- : बीड जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्याची बकरी ईद घरच्या घरी साजरी करावी या आवाहनासह जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
यावर्षी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय सण – उत्सवांना ब्रेक लागला आहे. सर्व धर्मियांनी या कठीण काळात आपले विविध सण – उत्सव साधेपणाने व घरच्या घरी साजरे करून आदर्श निर्माण केला आहे. बकरी ईद च्या संदेशाचा प्रत्यय देऊन मुस्लिम बांधवानी हा आदर्श उत्सव घरीच साजरा करावा असे मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, दिवसेंदिवस वाढत जाणारे हे आकडे चिंताजनक आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या सर्वत्र साजरी केली जाणारी बकरी ईद सुद्धा साधेपणाने साजरी करावी असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.
कोणत्याही ठिकाणी गर्दी न करता कुर्बानी साठी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे रीतसर परवानगी घेऊनच कुर्बानी द्यावी, तसेच शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना भेटण्याऐवजी समाज माध्यमांचा वापर करून एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष
२०२० हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जयंती महोत्सव आयोजित न करता उद्या एक ऑगस्ट रोजी साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती घरच्या घरीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून साजरी करावी असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जाग्या करत, २०२० हे वर्ष आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत, यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व खास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते. परंतु जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने या सर्व संकल्पनाना बंधन घातलं आहे. हे बंधन शरीराला असू शकतं, पण मनाला नाही! अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजरामर झालेले आहेत. त्यामुळे यंदाची जन्मशताब्दी विशेष जयंती आपण घराघरात आणि मनामनात साजरी करूयात, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.
आपण सर्व जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे अनुयायी म्हणून, आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षीची जयंती घरच्या घरीच अण्णाभाउंच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करू. कुठेही कोरोनाविषयक नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना अभिवादन करावे असे मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्व संध्येला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.