भारतात सलग दुसऱ्या दिवशी पाच लाखांहून अधिक चाचण्या
1.73 कोटींपेक्षा अधिक नमुन्यांची आज तपासणी
भारताच्या कोविड मृत्यु दरात आणखी घट होत तो आता 2.25%
नवी दिल्ली, दि.२८ :चाचणी, पाठपुरावा, उपचार (टेस्ट, ट्रॅक, ट्रीट) या धोरणानुसार भारताने सलग दोन दिवस प्रतिदिन पाच लाखांहून अधिक कोविड – 19 नमुन्यांची चाचणी करण्याचा नवीन उच्चांक कायम ठेवला आहे. कोविड – 19 पॉझिटिव्ह रुग्णांची लवकर ओळख आणि विलगीकरणातील पहिली महत्त्वाची पायरी म्हणून प्राधान्याने चाचणी करण्याबाबत केंद्रासह राज्यसरकारे / केंद्रशासित प्रदेश यांच्यातील सामायिक आणि केंद्रित प्रयत्नांचा झालेला हा परिणाम आहे. 26 जुलै रोजी, भारतात एकूण 5,15,000 नमुने तपासले गेले आणि 27 जुलै रोजी, एकूण 5,28,000 नमुने तपासण्यात आले.
वर्गीकृत आणि सतत वाढणाऱ्या प्रतिसादामुळे देशातील चाचणीचे जाळे सातत्याने वाढविण्यात आले असून आजवर केलेल्या प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 12,562 वर पोहोचले आहे. आज पर्यंत 1.73 कोटी चाचण्यांचा आकडा ओलांडला गेला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते काल व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन झालेल्या नोएडा, मुंबई आणि कोलकाता येथे तीन उच्चप्रतीच्या चाचणी सुविधांचा समावेश करून भारताच्या चाचणी क्षमतेस आणखी गती मिळाली आहे.
देशातील 1310 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 905 सरकारी प्रयोगशाळा आणि 405 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :
रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 668 : (शासकीय : 407 + खासगी : 261)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 537 (शासकीय : 467 + खासगी : 70)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 105 : (शासकीय : 31 + खासगी 74)
बरी होणारी रुग्ण संख्या 9.5 लाखांवर
भारताच्या कोविड मृत्यु दरात आणखी घट होत तो आता 2. 25% इतका झाला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये असलेले स्थान भारताने कायम राहिले आहे. प्रतिबंधात्मक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, अधिकाधिक कोविड चाचण्या, सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी लक्षणविरहीत रुग्णांसाठी वैद्यकीय देखरेखेखाली गृह अलगीकरण या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून मृत्युदर सतत कमी होत आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड मुळे होणारे मृत्यू कमी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गंभीर लक्षणे असलेल्या तसेच कोविडची रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने प्रभावीपणे व्यवस्थापन केले जात आहे. यामुळे देशभरात कोविड मृत्यू दरात घट दिसून येत आहे. जूनच्या मध्यावर 3.33 टक्के असलेला हा मृत्यदर आज 2.25 टक्के इतका झाला आहे.
तीन स्तरीय आरोग्य सुविधा आणि रुग्ण व्यवस्थापन यामुळे रुग्ण बरे होण्याचा दरही सातत्याने सुधारत आहे. प्रतिदिन तीस हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा आजचा सलग पाचवा दिवस आहे. केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचा रोख हा अधिकाधिक कोविड चाचण्या करून लवकरात लवकर बाधित रुग्ण शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करून त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर जूनच्या मध्यावर 53 टक्के होता तो आज 64 टक्क्यांहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात 35,176 इतके रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,52,743 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सुधारणा होत असल्यामुळे सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्यातील तफावत देखील वाढते आहे. सध्या हा फरक 4,55,755 इतका आहे. म्हणजेच सध्या 4,96,988 इतके सक्रिय रुग्ण असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.