राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर

मुंबई ,५ मे /प्रतिनिधी :-राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अमरावतीचे खासदार नवनीत आणि वडनेराचे आमदार रवी राणा या दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तब्बल १२ दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे.

राणा दाम्पत्य यांना प्रत्येकी ५० हजार आणि तितक्याच रकमेचे दोन जमीनदार अशी अट आहे. त्याचबरोबर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना अन्य अटी घातल्या आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्यानी व्हिडीओ जारी करत सांगितले होते. परंतु, त्यानंतरही पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याने पोलीस कोठडीतच काढली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.