संभाजी उद्यान खुले करा- मोहन इंगळे

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :- जालना शहरातील एकमेव निसर्गरम्य स्थळ म्हणजे संभाजी उद्यान. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून हे उद्यान बंद असून, ते तात्काळ सुरू करावे, अशी मागणी लायन्स क्लब जालना डायमंडचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन इंगळे यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात इंगळे यांनी म्हटले आहे की, नागरिकांना विरंगुळा म्हणून तसेच प्रभातफेरी म्हणून फिरण्यासाठी संभाजी उद्यान हे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे, मात्र गेल्या अडीच वर्षांपासून उद्यान बंद असल्याने अबालवृद्धांची गैरसोय होत आहे. जालनानगर परिषद प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन उद्यान लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.