कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे! – पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताकाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ, क्रीडा पुरस्कार वितरण, गुणवंतांचा सत्कार आणि कोरोना विषाणूच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे शहराचे महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.,  पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या व्हीजन डॉक्यूमेंटचे प्रकाशन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. आताही रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला पाहिजे. कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख 1 हजार 179 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर 9 लाख 59 हजार 778 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्करला बूस्टर डोस देण्यास सुरवात झाली आहे. अद्याप ज्या नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे.

ऑक्सिजनयुक्त एक हजार 668 बेड, 160 व्हेन्टिलेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत 205 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 18 वारसांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांना पाच लाख रुपयांप्रमाणे 65 लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. बालसंगोपन योजनेंतर्गत 458 बालकांना दरमहा 1100 रुपयांप्रमाणे अनुदानाची तरतूद केली आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नऊ हजार 705 लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांप्रमाणे 1 कोटी 94 लाख 10 हजार रुपये, तर तीन हजार रुपयांप्रमाणे 2 कोटी 91 लाख 15 हजार रुपयांचा निधी वितरीत केला आहे. याशिवाय आठ हजार 205 लाभार्थ्यांना 1500 रुपयांप्रमाणे 1 कोटी 23 लाख 7 हजार 500 रुपयांची मदत करण्यात आली आहे. घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्फे एक हजार 135 लाभार्थ्यांना 17 लाख 2 हजार पाचशे रुपयांचा निधी वितरीत केला आहे. कोरोना काळात धुळे जिल्ह्यातील 65 हजार 676 पात्र आदिवासी लाभार्थी बांधवांना खावटी अनुदान 2 हजार रुपये प्रमाणे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. तसेच 63 हजार लाभार्थ्यांना धान्य किट वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी निधीही दिला जात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून कोविड -19 विषाणू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सन 2021-22 करिता पहिला हप्ता म्हणून तीन कोटी 40 लाख 36 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकाने धुळे जिल्ह्यातील 45 हजार 74 खातेदार शेतकऱ्यांना 342 कोटी 72 लाख रुपयांची कर्जमुक्ती दिली आहे. याबरोबरच राज्य शासनाने नव्या नमुन्यातील सातबारा उतारा शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन लाख 92 हजार 755 खातेदारांना तीन लाख 37 हजार सातबारा उताऱ्यांचे वाटप केले आहे. धुळे जिल्ह्यातील 44 हजार 715 शेतकरी सभासदांना 494 कोटी 71 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले. रब्बी हंगामातही पीक कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाईल ॲपद्वारे ई- पीक पाहणी आज्ञावली विकसित केली आहे. ई- पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सक्रिय आणि व्यापक सहभाग आवश्यक आहे. आतापर्यंत आपल्या धुळे जिल्ह्यातील 1 लाख 81 हजार 890 शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणीत सहभाग नोंदविला आहे.  गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीचा हंगाम चांगला होईल. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 72 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. असे असले, तरी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ जाहीर केले आहे. कृषीपंप चालू देयकांची नियमित भरणा करण्यासाठी कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये भरीव सूट दिली. शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा आणि कृषी क्षेत्रातील वीजपंपासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यात येतील. दिवसा वीज पुरवठा करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.   कृषीपंप वीज जोडणी धोरणामध्ये कृषी पंप ग्राहकांना वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत पर्यंत सूट दिली आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. 31 मार्च 2022 पूर्वी 66 टक्के पर्यंत सवलत घेवून ‘वीज बिल कोरे’करून घ्यावे. या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्वाचा आहे. वीज बिलाच्या वसूल झालेल्या रक्कमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केले.

वनहक्क कायद्यानुसार जिल्ह्यात 14 हजार 566 दावे मान्य करण्यात आले आहे. या मान्य केलेल्या दाव्यांचे क्षेत्रफळ 62 हजार 589 एकर एवढे आहे. वनहक्क दावे मंजूर शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, विहीर खोदकामासाठी अनुदान योजना, शेती- अवजारांसाठी अर्थसाहाय्य, खते व बि- बियाण्यांसाठी अर्थसाहाय्य, बँकांकडून कर्ज योजनांचा लाभ देण्यात येतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून आतापर्यंत 6 लाख 50 हजार एवढे मनुष्य दिन निर्मिती झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 12 हजार 431 कामे पूर्ण झाली असून 16 हजार 158 कामे प्रगती पथावर आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाच कामे शेल्फवर उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 250 सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत, तर एक हजार 417 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनातून साकारलेल्या शिवभोजन योजनेचा अनेक गरिबांना लाभ होत आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना पोटभर अन्न मिळत आहे. या योजनेस आज बरोबर दोन वर्षे झाली. आपल्या धुळे जिल्ह्यात 31 शिवभोजन केंद्र सुरू आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून रोज दोन हजार 800 थाळ्यांचे वितरण होत आहे. आतापर्यंत 13 लाख 28 हजार पेक्षा जास्त गरजू व गरिबांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. गेल्या वर्षी चक्रीवादळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आपल्या जिल्ह्यातील 19 हजार 34 शेतकऱ्यांना 9 कोटी 31 लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 87 हजार 757 एवढ्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. दोनच दिवसांपूर्वी धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा 225 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, दळण- वळणाच्या सुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

गुणवंतांचा गौरव

यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी श्री. शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. गायकवाड (ध्वजनिधी संकलनात 100 टक्के इष्टांक पूर्ण) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक प्रल्हाद निवृत्ती खाडे (राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक), एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल खानदेश कॅन्सर सेंटर, धुळे, श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशल हॉस्पिटल, ट्रामा आणि क्रिटिकल केअर सेंटर, धुळे, जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे, जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त प्रमोद शांताराम पाटील, पोलिस पाटील पंकज नथू पाटील (खर्दे, ता. शिरपूर), कमलाकर रघुनाथ रायसिंग (तरडी, ता. शिरपूर), नितीन रुपा जाधव (बभळाज, ता. शिरपूर) आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण (भूसंपादन), डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, तहसीलदार गायत्री सैंदाणे, आशा गांगुर्डे यांच्यासह विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.