शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल

सातारा,२४ डिसेंबर/प्रतिनिधी:- शेतकऱ्यांनी पिकवलेला फळे, भाजीपाला हा काही कालमर्यादेपुरताच टिकून राहतो. काल मर्यादा संपल्यानंतर त्यांचा माल हा खराब होतो व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. यामुळे  शेतकऱ्यांना, देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.

गुठाळवाडी ता. खंडाळा या गावातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील विविध कामांची पहाणी आज केंद्रीय राज्यमंत्री श्री. पटेल यांनी केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. पटेल म्हणाले,  भारतीय शेती मालाला जगात मोठी मागणी आहे, परंतु शेतकऱ्यांना बाजार पेठेची माहिती नाही शेतकऱ्यांचा प्रक्रिया केलेल्या शेती मालाला बाजार पेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यांना घर नाही अशांना घरे, शौचालय व आरोग्य या मुलभूत गरजा नागरिकांना प्राधान्याने मिळावे यासाठी केंद्र शासनाने भर दिला आहे. ज्या गावांमध्ये पाण्याच्या योजना आहेत त्याची वेळोवेळी देखभाल केली पाहिजे. तेथील पाण्याचे नमुने आठवड्याला तपासले पाहिजेत. यासाठी महिलांचा 50 टकके सहभाग घ्यावा व त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करुन पाणी कमी पडणार नाही यासाठी आत्तापासून पाण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुठाळवाडीने आदर्श काम झाले आहे. संपूर्ण गाव हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण असून. शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसायाकडे वळाले पाहिजे. गुठाळवाडीच्या काय समस्या आहेत त्या लेखी स्वरुपात द्याव्यात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे खासदार श्री. पाटील यांनी सांगितले.

गुठाळवाडीतील रस्ते, गटारे व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे. गावा शेजारील तळे हे बारमाही असून तळ्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करता येईल. या तलावाच्या दुरस्ती निधीसाठी मिळावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. कबुले यांनी व्यक्त केली.

जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी अपशिंगे (मि.) व शिरवळ ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील जलजीवन मिशन व स्वच्छता अभियानाची पाहणी केली.