चानूने मिळवलेले पदक हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी : अनुराग ठाकूर

मीराबाई चानूचे भारतात भव्य स्वागत

क्रीडा मंत्र्यांनी एका विशेष सोहळ्यात ऑलिंपिक पदकविजेतीचा केला सत्कार

खेळाडूंच्या विकासात आणि भारताच्या पदकांच्या अपेक्षांमध्ये टॉप्स या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे  चानूच्या या यशाने दाखवून दिले : केंद्रीय क्रीडा मंत्री

Image

सरकारने मला सर्वतोपरी सहाय्य केले त्याशिवाय ऑलिंपिक पदकापर्यंतची माझी वाटचाल शक्य नव्हती . : मीराबाई

नवी दिल्ली ,२७जुलै /प्रतिनिधी :- टोक्यो ओलंपिकमधील भारताची पहिली पदक विजेती सैखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा काल संध्याकाळी स्वदेशी परतले. भारतात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. केंद्रीय  क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या घरी आयौजित विशेष सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रीजीजू .केंद्रीय पर्यटन ,सांस्कृतिक कार्य आणि ईशान्य भारत क्षेत्र विकास मंत्री किशन रेड्डी , केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री निसीथ प्रामाणिक हे ही आवर्जून उपस्थित होते.

भारोत्तोलनात महिलांसाठीच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलेल्या मीराबाई चानूने सामर्थ्य आणि मनाची तयारी यासाठीचे प्रशिक्षक एरॉन होर्शिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी 1 मे रोजी अमेरिकेला प्रयाण केले होते.

कोविड-19 रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे भारतातून येणाऱ्या लोकांवर अमेरिकेत प्रवासासाठीचे निर्बंध लागू होण्याच्या काही दिवसापूर्वी  अत्यंत कमी काळात सरकारने चानूला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाण्यास सहाय्य केले.

सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य नव्हता

“माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. याच क्षणासाठी मी कित्येक वर्षे प्रशिक्षण घेत होते आणि सर्वांसाठीच भव्य असणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा मंचावर माझे स्वप्न साकार झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षभारित चानूने यावेळी व्यक्त केली  .

वर्षानुवर्षे तत्परतेने सहकार्य करणाऱ्या सरकारचे, विशेषतः गेल्यावर्षीच्या तसेच अलीकडच्या अमेरिका वारीसाठी सहाय्य केल्याबद्दल चानूने सरकारचे आभार मानले.

गेल्यावर्षी माझ्या खांद्याशी संबंधित दुखापतीवर उपचारासाठी केलेला अमेरिकेचा दौरा पदकांसाठीच्या माझ्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला.

यासाठी सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी सरकारची आभारी आहे , त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य नव्हता .

“टारगेट ऑलिंपिक पोडियम योजनेने (TOPS) माझे करियर तसेच पदकांविषयीच्या अपेक्षा उंचावल्या.” अशी प्रतिक्रिया मीराबाई चानूने दिली.

खेळाडूंच्या नवीन पिढीलाविशेषतः ईशान्य भागातील खेळाडूंना ती प्रेरणा देत राहील

मीराबाई चानूचे यश हे , टोक्यो  ऑलिम्पिकच्या पदक सोहळ्यात भारताचा झेंडा फडकावला गेला आणि भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा अभिमानाने भरून आलेल्या 130 कोटी भारतीयांचे यश आहे, असे उद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन करताना काल काढले.

भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात क्रीडा स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आपल्या खेळाडूंच्या विकासात आणि परिणामी भारताच्या पदकांच्या अपेक्षा उंचावण्यात या कार्यक्रमाने किती महत्वाची भूमिका भूमिका बजावली आहे हे तिच्या यशाने दाखवून दिले आहे.खेळाडूंना आपल्यामधील प्रतिभा विकसित करता येण्यासाठी तसेच त्यांना सर्वोत्तम स्तरावर सर्वोत्कृष्टता प्राप्त करता यावी म्हणून केंद्र सरकार प्रत्येक सुविधा पुरवणे सुरूच ठेवेल.’ असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला

“तिच्या यशने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. खेळाडूंच्या नवीन पिढीला, विशेषतः ईशान्य भागातील खेळाडूंना ती प्रेरणा देत राहील. ” असेही ठाकुर यांनी सांगितले.

केंद्रीय विधी   मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की टोक्योला जाण्यापूर्वी झालेल्या आमच्या संभाषणात तिने देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला.

“तिच्या या भव्य यशाने प्रत्येक भारतीयाप्रमाणेच मीही आनंदाने आणि अभिमानाने भरून गेलो आहे. तिने भारताला मिळवून दिलेला गौरव आणि मान हा तिच्या वर्षानुवर्षाच्या चिकाटीचे, समर्पणाचे आणि कठोर मेहनतीचे फळ आहे. आणि तिच्यावर जो प्रशंसेचा वर्षाव होत आहे त्यावर तिचा पुरेपूर अधिकार आहे” , असेही रिजिजू यांनी नमूद केले.

ईशान्य प्रदेशातील सक्रीय क्रीडा संस्कृती भारताला बहुमान प्राप्त करून देत आहे.


 केंद्रीय मंत्री किशन रेड्डी म्हणाले, “आपल्या देशातील कन्या भारतमातेला गौरव प्राप्त करून देत आहेत हे पाहून माझे हृदय अभिमानाने भरून येते आहे. रौप्य पदक गळ्यात घालून मानाच्या स्तंभावर उभ्या राहिलेल्या मीराबाईने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे. सफलता मिळविण्यासाठी तिने केलेला प्रवास केवळ क्रीडा जगतालाच नव्हे तर स्वप्ने आणि ध्येये उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक युवक, युवतीसाठी स्फूर्ती देणारा आहे. या उत्सवी पर्वाची संधी साधून मी क्रीडा आणि आरोग्याबाबतच्या उपक्रमांबाबत ईशान्य भारतातील जनतेमध्ये असणाऱ्या उत्सुकतेची नोंद घेऊ इच्छितो आणि या प्रदेशातील सक्रीय क्रीडा संस्कृती भारताला अनेक बहुमान प्राप्त करून देत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करतो.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीदेखील मीराबाईने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. ते तिला म्हणाले की, “तू देशाला नवी प्रेरणा दिली आहेस, आम्हां सर्वांना तुझा अभिमान वाटतो.”
विजेती भारोत्तोलक मीराबाई हिच्याबद्दल प्रामाणिक यांनी देखील गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणाले, “हे रौप्य पदक म्हणजे अनेक वर्षांची कठोर मेहनत आणि तयारी यांचे फळ आहे. ऑलिम्पिकच्या मैदानावर आम्ही तुला वजन उचलताना आणि पदक जिंकताना पाहिले, हा आम्हा 135 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हे पदक हा तुझ्या अभिमानास्पद कामगिरीचा एक भाग आहे.आणि तू येथेच थांबणार नाहीस याची आम्हाला खात्री आहे. येत्या काळात आणखी पदकांची कमाई करण्यासाठी माझ्या आणि संपूर्ण देशाच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत.