बाबाजी भक्त परिवाराशी ऋणानुबंधाचे नाते – छत्रपती संभाजीराजे भोसले
खुलताबाद,१२ डिसेंबर /प्रतिनिधी :- जय बाबाजी भक्तपरिवाराशी आमचे ऋणानुबंधाचे नाते असल्याचे आम्हास नेहमी वाटते. कारण आम्ही जास्त करून कोणत्या महाराजाकडे जात नाही. परंतु आम्ही नेहमी स्वामी शांतिगिरी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो, याचे कारण शांतिगिरी महाराजांची असलेली अनुष्ठान परंपरा व त्यांचे सर्व सामान्यासह शेतकरी वर्गातील भक्त परिवार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जसे सामान्यातील सामान्यासाठी कार्य केले तसेच कार्य येथेही चालते. यामुळेच जय बाबाजी भक्तपरिवारासोबत आमचे ऋणानुबंधाचे नाते असल्याचे आम्हास वाटते. या सोबत वेरुळच्या मातीत येणे ह्या मध्ये आमचाही स्वार्थ असून याच मातीने छत्रपती शिवाजी राजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले आपणास दिले असून भोसल्यांच्या घराण्यांची पावन गढी ही येथेच असल्याचे मत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शनिवारी वेरुळ येथील जनार्दन स्वामी आश्रमात निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणार्थ वेरुळ येथे सुरू असलेल्या जय हनुमान धर्म संस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी धर्मपीठाचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळयात १११ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ , जपानुष्ठान , महिला जप , अखंड नंदादीप , व्यसनमुक्ती शिबिर , प्रवचन , व्याख्यान , समाज प्रबोधनपर मार्गदर्शन पार पडत असुन या निमित्ताने अनेक मान्यवर येथे भेटी देत असून शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीराजे भोसले ह्यांनीही या सोहळयास भेट दिली. यावेळी छत्रपतिंची रथामधुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी १०८ महंत स्वामी सेवागिरी महाराज , रामानंद महाराज , सोहळा अध्यक्ष राजेंद्र पवार , शिवाभाऊ अंगुलगावकर , शेकनाथ होळकर , राजू चव्हाण , कैलास कुऱ्हाडे आदींची उपस्थिती होती.