साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी; संमेलन हे साहित्यिकांसह आपल्या सर्वांचे असल्याने उत्सव म्हणून साजरे करू : स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

नाशिक,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ते आज भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, विश्वास ठाकूर, शंकर बोऱ्हाडे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, डॉ.शेफाली भुजबळ,संजय करंजकर, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसर सुशोभीकरणावर अधिक भर देण्यात यावा. आपल्या दर्जेदार व्यवस्थेतून  येणाऱ्या साहित्यप्रेमिंना ज्या सुविधा मिळतील त्यातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहचणार आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.  साहित्य संमेलनाचा उत्सव दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे असणार आहे.

स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आदरतिथ्य करणारे नाशिक याद्वारे अवघ्या साहित्य विश्वासमोर जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, आयोजनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधीं समवेत देखील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन ही प्रत्येकाचा जबाबदारी समजून कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करू. पर्यटन विभागाचे केंद्र या संमेलन स्थळी उभारण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगताना जिल्हा प्रशासन, माहापालिका प्रशासन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणांनी आपापल्या परिने यांत योगदान देवून  अनेक वर्षे स्मरणात राहील असे दर्जेदार साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी करून तेथे करण्यात आलेल्या सेवा-सुविधांची माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी करून घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार हेमंत टकले, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर यांनी सहभाग घेतला.