भारतात दररोज 1.25 कोटी लोकांचे लसीकरण-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

नवी दिल्ली,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- देशात दररोज 1.25 कोटी लोकांचे लसीकरण केले जात आहे. हा आकडा काही देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांसोबत आभासी स्वरूपात संवाद साधताना आज सोमवारी सांगितले.

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.

वाहतुकीची समस्या असतानाही सर्वच पात्र नागरिकांना लसीची पहिली मात्रा देऊन हिमाचल प्रदेशने विक्रम घडवला आहे, असे त्यांनी आभासी स्वरूपात झालेल्या कार्यक्रमात सांगितले. सिक्कीम, दादरा-नगर-हवेलीने देखील हे उद्दिष्ट गाठले आहे. लसीकरण कार्यक्रमात सहभागी असलेल्या हिमाचल प्रदेशातील आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांसोबत त्यांनी आभासी स्वरूपात संवाद साधला. आरोग्य कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट काम केले आहे, असे कौतुक त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यांसोबत साधलेल्या संवादादरम्यान केले.
 
 
सिमला जिल्ह्यातील दोदरा क्वार येथील सामान्य रुग्णालयातील डॉ. राहुल यांच्यासोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, लसीकरणादरम्यान एकाच कुपीतील सर्वच 11 इंजेक्शन्स वापरली, तर खर्चात 10 टक्के बचत होऊ शकते.

संवादादरम्यान, दोदरा क्वार शिमला, येथील सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. राहुल यांच्याशी बोलताना, लसींचा अपव्यय कमी राखल्याबद्दल पंतप्रधानांनी या चमूची प्रशंसा केली  आणि दुर्गम भागामध्ये सेवा बजावण्याच्या त्यांच्या अनुभवाबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली. थुनाग, मंडी येथील लसीचे लाभार्थी दयाल सिंह यांच्याशी बोलताना लसीकरणाच्या सोयी सुविधा आणि लसीकरणाबाबतच्या अफवांना ते कसे सामोरे गेले याची पंतप्रधानांनी चौकशी केली. लाभार्थ्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधानांनी हिमाचलच्या पथकाचे सांघिक प्रयत्नाबद्दल कौतुक केले. लसीकरण मोहिमेतील अनुभव जाणून घेताना पंतप्रधानांनी कुलू येथील आशा कर्मचारी निर्मला देवी यांच्याशी संवाद साधला. लसीकरण मोहिमेमध्ये त्यांनी स्थानिक परंपरांचा कसा वापर करून घेतला याबाबत पंतप्रधानांनी जाणून घेतले. पथकाकडून विकसित करण्यात आलेल्या संवाद माध्यमाचे आणि सहकार्य पद्धतीच्या नमुन्याची प्रशंसा केली. त्यांचे पथक कशाप्रकारे दूर-दूरचे अंतर पार करून लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जात असे, याची पंतप्रधानांनी चौकशी केली.

हमीरपूर, येथील निर्मला देवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना आलेल्या अनुभवांविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली, लसींचा पुरेसा पुरवठा केल्याबद्दल या ज्येष्ठ नागरिकांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि मोहिमेला शुभेच्छा दिल्या. हिमाचलमध्ये राबविल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक योजनांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. उना येथील कर्मो देवीजी,यांनी  22500 लोकांचे लसीकरण केले आहे. त्यांचा एक पाय फ्रॅक्चर असताना देखील त्यांनी लसीकरण मोहिमेसाठी दाखविलेल्या धैर्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही कर्मो देवी यांच्यासारख्या लोकांमुळे जारी आहे. अध्यात्मिक नेता या माध्यमातून लाहौल आणि स्पिती येथील नवांग उपाशक यांनी कशाप्रकारे नागरिकांना लस घेण्यासाठी लोकांना प्रेरित केले, याबाबत पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. अटल बोगद्याचा या प्रदेशातील जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल देखील मोदी यांनी यावेळी संवाद साधला. उपाशक यांनी प्रवासाचा वेळ कमी करणे आणि सुधारित कनेक्टीव्हिटीबद्दल माहिती दिली. लाहुल स्पितीला लसीकरण मोहिमेचा सर्वात वेगवान अवलंब करण्यास सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी बौद्ध नेत्यांचे आभार मानले.

जनसमुदायाला संबोधताना, पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीच्या विरुद्धच्या लढ्यात हिमाचल प्रदेश चाम्पियन म्हणून उदयास आला आहे. ते पुढे म्हणाले की, हिमाचल हे भारतातील पहिले राज्य बनले आहे, ज्याने त्याच्या संपूर्ण पात्र लोकसंख्येला कोरोना लसीची  किमान एक मात्रा दिली आहे. या यशामुळे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

नागरिकांचे धैर्य आणि कष्ट यांचाच परिणाम म्हणजे भारतात झालेल्या लसीकरणाचे यश आहे, असे ते म्हणाले. भारत आज दिवसाला सव्‍वा कोटी मात्रा देऊन विक्रम नोंदवत आहे. याचाच अर्थ असा की, भारतात एका दिवसात लसीकरणाची संख्या ही अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. लसीकरण मोहिमेतील सहभागाबद्दल पंतप्रधानांनी डॉक्टर्स, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक आणि महिलांचे कौतुक केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी ‘सबका प्रयास’ बद्दल बोलल्याचे स्मरण करत  ते म्हणाले की हे यश त्याचाच आविष्कार आहे. हिमाचल ही देव भूमी असल्याचे सांगत त्यांनी या संदर्भात संवाद आणि सहयोगाने काम करण्याच्या पद्धतीची प्रशंसा केली.