पारदर्शक आणि जलद निर्णय यांच्या महत्वावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिला भर

नवी दिल्ली,११ ऑगस्ट /प्रतिनिधी :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कालबद्ध, पारदर्शी आणि जलद निर्णय घेण्याच्या महत्वावर भर दिला.

भारतीय उद्योजक महासंघ म्हणजेच CII च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना ते म्हणाले की, सर्वांचे एकत्रित प्रयत्न आणि सर्व संबंधितांकडून मिळालेले सहकार्य यामुळे कोविड महामारीतही उत्तम काम साधता आले.

दर दिवशी 38 किलोमीटरची रस्तेबांधणी हा जागतिक विक्रम आपण केला असला तरी दिवसभरात शंभर किलोमीटर पेक्षा जास्त रस्तेबांधणी हे आपले लक्ष्य आहे.

जीपीएस आधारित ट्रॅकिंग पद्धतीबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की याबद्दल आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सादरीकरण प्राप्त झाले असून त्याबद्दल तीन महिन्यांच्या कालावधीत ठोस धोरण ठरविण्यात येईल.

येत्या वर्षभरात दिल्ली ते डेहराडून दोन तासात पार करता येईल, तर दिल्ली ते हरिद्वार अंतरही दोन तासात, दिल्ली ते चंदीगड दोन तासात पार करता येईल, त्याशिवाय येत्या सहा महिन्यात दिल्ली ते जयपूर हे अंतर दीड तासात पार करत येईल,‌ असा विश्वास त्यांनी दिला.नवीन रस्ते आणि ग्रीन कनेक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे मंत्रीमहोदयांनी नमूद केले.